पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदी थेट ॲक्शनमध्ये; सौदी दौरा अर्धवट सोडला, दिल्ली विमानतळावरच घेतली तातडीची बैठक
पुढारी ऑनलाईन डेस्क : Pahalgam Terror Attack | काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियाचा दौरा अर्धवट सोडून आज सकाळी भारतात परतले. दिल्लीत पोहचल्यानंतर मोदींनी विमानतळावरच तातडीची बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि इतर अधिकाऱ्यांकडून त्यांनी हल्ल्याची माहिती घेतली. हल्ल्यानंतर मोदी थेट ॲक्शनमध्ये असून त्यांनी आज सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची देखील तातडीने बैठक बोलावली आहे.
अजित डोवाल आणि एस जयशंकर यांनी दिली माहिती
सौदीहून परतलेल्या पंतप्रधान मोदींनी विमानतळावरील बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याशी हल्ल्यानंतरच्या परिस्थितीवर चर्चा केली. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम येथील एका प्रमुख पर्यटन स्थळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान ३० जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. मृतांमध्ये युएई आणि नेपाळमधील दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिकांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बोलावली तातडीची बैठक
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याने किमान २६ जणांचा मृत्यू झाला. लष्कराच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये पर्यटकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारले, त्यांची ओळखपत्रे तपासली आणि नंतर ते हिंदू असल्याचे सांगत त्यांना गोळ्या घालून ठार मारले. २६ मृतांपैकी बहुतेक पर्यटक आहेत, तर दोन परदेशी आणि दोन स्थानिक नागरिक आहेत. या हल्ल्यात सुमारे २० जण जखमी झाले आहेत. तथापि, सरकारने आतापर्यंत फक्त १६ मृत्यूंची पुष्टी केली आहे. त्याच वेळी, सुरक्षा यंत्रणांनी काल रात्री उशिरा काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ आज जम्मू बंद आहे. आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक होणार आहे. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांनाही तत्काळ आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत.

