

Manoj Tiwary TMC Allegation
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि तृणमूल काँग्रेसचा (TMC) मावळता आमदार मनोज तिवारी याने मंगळवारी "माझ्यासाठी टीएमसीचा अध्याय आता संपला आहे" असे जाहीर केले. हावडा येथील शिवपूर मतदारसंघातून तिकिटासाठी पक्षाने ५ कोटी रुपयांची मागणी केली होती आणि ती फेटाळल्यामुळेच आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आली, असा खळबळजनक आरोप तिवारीने केला आहे.
मनोज तिवारी हा बंगालच्या क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक धावा करणारा (१०,१९५ प्रथम श्रेणी धावा) फलंदाज आहे. ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये तो क्रीडा राज्यमंत्री होता. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने मुसंडी मारल्यानंतर ममता बॅनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात आली आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत तिवारी म्हणाला, "या पराभवाचे मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही. जेव्हा संपूर्ण पक्ष भ्रष्टाचारात बुडालेला असतो आणि कोणत्याही क्षेत्रात विकास होत नाही, तेव्हा असेच घडणार होते. केवळ तेच लोक तिकीट मिळवू शकले ज्यांनी मोठी रक्कम मोजली. यावेळी किमान ७० ते ७२ उमेदवारांनी तिकिटासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये दिले आहेत. मलाही विचारण्यात आले होते, पण मी पैसे देण्यास नकार दिला. ज्यांनी पैसे दिले त्यापैकी किती जण निवडून आले ते तपासा. माझ्यासाठी आता टीएमसीचा विषय कायमचा संपला आहे."
२०१९ मध्ये टीएमसीने लोकसभेचे तिकीट देऊ केले होते, तरीही राजकारणात येण्याची आपली इच्छा नव्हती, असे तिवारीने सांगितले. मात्र, २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्याने शिवपूरमधून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला होता. तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीचा अभाव असल्याचे सांगत तिवारी म्हणाला, "मला राज्यमंत्री हे नावापुरते पद देण्यात आले होते, ज्याला काहीच अर्थ नव्हता. जर मी बैठकीत एखाद्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, तर 'दीदी' (ममता बॅनर्जी) आम्हाला मध्येच थांबवून म्हणायच्या की, 'माझ्याकडे तुम्हा लोकांसाठी वेळ नाही'."
हावडा जिल्ह्यातील सांडपाणी आणि ड्रेनेज यंत्रणेच्या दुरवस्थेबद्दल बोलताना तो म्हणाला, "आमदार असूनही मला माझ्या मतदारसंघातील कामांसाठी एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात चकरा माराव्या लागायच्या. हावडा महानगरपालिकेवर वर्षानुवर्षे नियंत्रण ठेवणाऱ्यांना विकासाची पर्वा नव्हती. अनेकदा तर मी आमदार निधी व्यतिरिक्त स्वतःच्या खिशातून पैसे देऊन विकासकामे पूर्ण केली आहेत, असेही तिवारीने सांगितले.
"२०२१ च्या निवडणुकीपूर्वी मी २० कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. मी १० वर्षे आयपीएल, २० वर्षे प्रथम श्रेणी क्रिकेट आणि अनेक वर्षे भारतीय संघातून खेळलो आहे. मला वसुलीच्या पैशांची गरज नाही. काही स्थानिक नगरसेवक माझ्याविरुद्ध खोटे आरोप करत होते," असेही तिवारीने स्पष्ट केले.
क्रीडा मंत्री अरूप विश्वास यांच्यावर टीका करताना तिवारी म्हणाला, "अरूपदादांना खेळातील मुळाक्षरेही माहित नाहीत. त्यांच्या असुरक्षिततेमुळे त्यांनी मला माझे मंत्रिपद नीट हाताळू दिले नाही. ड्युरंड कपच्या एका कार्यक्रमात माझे फोटो प्रसिद्ध झाले, तेव्हापासून पुढच्या कार्यक्रमांना मला निमंत्रण देणेच बंद झाले.
कोलकात्यात झालेल्या लिओनेल मेस्सीच्या कार्यक्रमावरही त्याने टीका केली. तो म्हणाला की, "तो कार्यक्रम म्हणजे एक गोंधळ होता. राजकारण्यांनी मेस्सीला घेरले होते आणि सर्वसामान्य जनतेची फसवणूक झाली. मला माहित होते असे काहीतरी होईल, म्हणून मी तिथे गेलो नाही."
बीसीसीआयची 'लेव्हल २' कोचिंग परीक्षा उत्तीर्ण झालेला मनोज तिवारी आता बंगालच्या रणजी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास इच्छुक आहे. "बंगाल क्रिकेट असोसिएशनने (CAB) मुख्य प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. मी ही परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली असून, भविष्यात मला कोचिंगमध्ये करिअर करायचे आहे," असे सांगत त्याने आपल्या पुढील वाटचालही यावेळी स्पष्ट केली.