

West Bengal Bypoll TMC: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. नंदीग्रामनंतर आता रेजीनगर विधानसभा मतदारसंघातील टीएमसी उमेदवार रबीउल आलम चौधरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या दोन मतदारसंघांतील पोटनिवडणुकीत टीएमसीची थेट निवडणूक लढत संपुष्टात आली आहे.
रेजीनगर मतदारसंघासाठी रबीउल आलम चौधरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजेच १९ सप्टेंबर रोजी त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यांच्या या निर्णयामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
यापूर्वी नंदीग्राम मतदारसंघातील टीएमसीच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनीही उमेदवारी मागे घेतली होती. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांची भेट घेतल्याचे वृत्त समोर आले होते. आता रेजीनगरमधील उमेदवारानेही माघार घेतल्याने टीएमसीच्या राजकीय रणनीतीबाबत चर्चा सुरू झाली आहे.
नंदीग्राममध्ये टीएमसी उमेदवाराने माघार घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. काँग्रेसने या मतदारसंघातून मिलन प्रधान यांना उमेदवारी दिली. मात्र, त्यानंतर मिलन प्रधान यांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल असल्याचे वृत्त आहे.
पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये ६ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १९ सप्टेंबर निश्चित केली होती. याच दिवशी रेजीनगरमधील टीएमसी उमेदवाराने उमेदवारी मागे घेतली.
रेजीनगर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मोहम्मद अब्दुल्लाह निवडणूक लढवत आहेत. तर सीपीएमने अॅडव्होकेट सईद असद अली यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने शंखारव सरकार यांना मैदानात उतरवले आहे.
दुसरीकडे नंदीग्राममध्ये काँग्रेसकडून मिलन प्रधान, तर सीपीआयकडून शांती गोपाल गिरी निवडणूक लढवत आहेत.
भाजपने नंदीग्राम मतदारसंघातून हासी रानी रथ यांना उमेदवारी दिली आहे. त्या मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे माजी पीए चंद्रनाथ रथ यांच्या आई आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर चंद्रनाथ रथ यांची हत्या झाली होती.
त्यामुळे नंदीग्राम आणि रेजीनगर या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणूक आता अधिक चर्चेत आली आहे. टीएमसीच्या दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्याने या निवडणुकीचे राजकीय समीकरणही बदलले आहे.