

NEET Paper Leak Controversy
नवी दिल्ली: (नीट (NEET) पेपर लीक आणि सीबीएसई (CBSE) ऑन-स्क्रीन मार्किंगमधील त्रुटींवरून विरोधक केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. मात्र, ही मागणी पूर्णपणे ‘राजकीय’ असल्याचा पलटवार केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे. "शिक्षणमंत्री आपल्या जबाबदारीपासून पळ काढत नसून, ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत," असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.
'द इंडियन एक्सप्रेस'च्या कार्यक्रमात बोलताना किरेन रिजिजू म्हणाले, पेपरफुटी आणि मूल्यमापनातील त्रुटींमुळे बाधित झालेल्या लाखो विद्यार्थ्यांच्या चिंतेवर सरकारची भूमिका मांडली. 'जर आज भाजप विरोधकांत असती, तर त्यांनीही शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नसती का?' या प्रश्नावर रिजिजू यांनी दोन्ही परिस्थितींमध्ये मोठा फरक असल्याचे सांगितले. रिजिजू यांनी संस्थांच्या स्वायत्ततेचा मुद्दा मांडत सांगितले की, एखाद्या मंत्र्याने किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी थेट भ्रष्टाचार केला असेल, तर त्याची जबाबदारी मंत्र्यांची असते. मात्र, जर एखाद्या स्वायत्त (Independent) संस्थेत गडबड झाली, तर त्या संस्थेने उत्तर देणे गरजेचे आहे." सीबीएसई (CBSE) आणि राष्ट्रीय परीक्षा एजेंसी (NTA) या दोन्ही स्वतंत्र संस्था असून त्यांच्या दैनंदिन कामकाजावर मंत्र्यांचे थेट नियंत्रण नसते, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांवर निशाणा साधताना रिजिजू म्हणाले, "१२ वर्षांपूर्वी जेव्हा भाजप विरोधी पक्षात होती, तेव्हा दरमहा कोणत्या ना कोणत्या मंत्र्यावर किंवा मंत्रालयावर भ्रष्टाचाराचे थेट आरोप होत होते. मात्र, गेल्या १२ वर्षांत एकाही केंद्रीय मंत्र्यावर किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांवर लाचखोरी किंवा नातेवाईकांना फायदा पोहोचवण्यासाठी यंत्रणेचा गैरवापर केल्याचा कोणताही थेट आरोप झालेला नाही."