

Kerala election results 2026 Who will be Kerala next CM?
तिरुवनंतपुरम: केरळमध्ये डाव्यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत काँग्रेसप्रणित 'संयुक्त लोकशाही आघाडी'ने (UDF) विजय निश्चीत केला आहे. डाव्या लोकशाही आघाडीच्या (LDF) सत्तेला सुरुंग लावत 'यूडीएफ' विजयाचा गुलाल उधळण्याच्या तयारीत असतानाच, आता राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सध्याच्या चित्रानुसार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांचे नाव या शर्यतीत सर्वात आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
गेल्या पाच वर्षांपासून पिनाराई विजयन सरकारविरुद्ध आक्रमक भूमिका घेणारे व्ही. डी. सतीशन हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ६० वर्षीय सतीशन हे २००१ पासून सलग पाच वेळा परावूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. व्यवसायाने वकील असलेल्या सतीशन यांची अभ्यासू वृत्ती आणि प्रभावी वक्तृत्व यामुळे त्यांची पक्षात आणि जनतेत मोठी प्रतिमा निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, एक्झिट पोलमध्येही जनतेने सतीशन यांनाच पहिली पसंती दिली आहे.
यूडीएफमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या 'इंडियन युनियन मुस्लिम लीग'ने सतीशन यांच्या नावाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. "जनतेचा कौल सतीशन यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट दिसत आहे," असे विधान मुस्लिम लीगचे प्रदेशाध्यक्ष पाणक्काड सादिक अली शिहाब थांगल यांनी केले आहे. मात्र, मित्रपक्षाच्या या हस्तक्षेपामुळे आघाडीत काही प्रमाणात अस्वस्थताही पाहायला मिळत आहे. 'एसएनडीपी' योगमचे नेते वेल्लापल्ली नटेशन यांनी "यूडीएफ सत्तेत आल्यास सरकारवर मुस्लिम लीगचाच वरचष्मा राहील," अशी टीका करत नव्या वादाला तोंड फोडले आहे.
सतीशन यांचे नाव चर्चेत असले तरी काँग्रेसमधील इतर ज्येष्ठ नेत्यांची नावेही पुढे येत आहेत. यामध्ये प्रदीर्घ अनुभव आणि पक्षश्रेष्ठींशी असलेले निकटचे संबंध यामुळे चेन्नीथला हे शर्यतीत कायम आहेत. काँग्रेस हायकमांडचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे के. सी. वेणुगोपाल यांचे नावही चर्चेत आहे. तिरुवनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांच्या नावाचीही चर्चा रंगली होती, मात्र त्यांनी "मुख्यमंत्र्याची निवड ही निवडून आलेले आमदार आणि हायकमांड करतील," असे म्हणत या वादापासून दूर राहणे पसंत केले आहे.
काँग्रेसच्या परंपरेनुसार, निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित आमदारांची बैठक होईल आणि त्यानंतर दिल्लीतील पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करतील. जातीय समीकरणे, अंतर्गत गटबाजी आणि मित्रपक्षांची मर्जी सांभाळण्याचे मोठे आव्हान काँग्रेस हायकमांडसमोर असणार आहे. येत्या काही तासांत केरळच्या राजसत्तेची सूत्रे कोणाच्या हाती जाणार, हे स्पष्ट होईल.