पुढारी ऑनलाईन डेस्क : Kathua Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात 8 जुलै रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत आता केंद्र सरकारकडून मोठे वक्तव्य आले आहे. लष्कराच्या पाच जवानांच्या हत्येचा बदला घेतला जाईल, असे संरक्षण सचिव गिरीधर अरमाने यांनी मंगळवारी सांगितले.
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये सोमवारी (दि. 8) दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये उत्तराखंडचे पाच जवान शहीद झाले. या वृत्तानंतर देवभूमी शोकसागरात बुडाली. दरम्यान, पाच जवानांच्या हौतात्म्या बदला घेतला जाईल आणि या हल्ल्यामागील दुष्ट शक्तींना भारत सोडणार नाही, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
हल्ल्यानंतर संरक्षण सचिवांनी कडक संदेश दिला आणि म्हटले की, ‘बडनोटा, कठुआ येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. त्याबद्दल आम्ही तीव्र दु:ख व्यक्त करतो. शहीदांच्या कुटुंबांप्रती आमच्या संवेदना व्यक्त करतो. त्यांनी देशासाठी केलेली निस्वार्थ सेवा सदैव स्मरणात राहील. त्यांच्या बलिदानाचा बदला घेतला जाईल.’ संरक्षण मंत्रालयाने ट्विटरवर एका पोस्टमध्ये ही टिप्पणी शेअर केली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शहीद जवानांबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
वास्तविक, सर्व सैनिक बडनोटा येथील डोंगराळ भागात गस्तीसाठी निघाले होते. एका बाजूला दरी असल्याने वाहनाचा वेगही कमी होता, त्याचा फायदा दहशतवाद्यांनी घेतला. टेकडीवर घात करून बसलेल्या दहशतवाद्यांनी सैन्याच्या वाहनावर हल्ला केला. लष्करानेही पलटवार केला, मात्र सर्व दहशतवादी जंगलाच्या दिशेने पळून गेले. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.