पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील दोन बलाढ्य कंपन्यांनी पाठोपाठ बिलदरवाढ केल्याने आजपासून मोबाईल बिल वाढले आहे. टेलिकॉम कंपन्यांनी ५-जीवर केलेली गुंतवणूक, त्या तुलनेत स्थिर असलेले दरडोई उत्पन्न यामुळे मोबाईल दरात वाढ करण्यात आली आहे. सर्वांत मोठी ग्राहकसंख्या असलेल्या जिओने विविध प्लॅनमध्ये १२ ते २५ टक्क्यांनी वाढ केली आहे. पाठोपाठ एअरटेलने विविध प्लॅनमध्ये १० ते २१ टक्के दरवाढ केल्याने ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
जिओ आणि एअरटेलचे प्लॅन आजपासून महाग झाले आहेत. जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन १५५ रुपयांऐवजी १८९ रुपयांचा झाला आहे. एअरटेलने अमर्यादित व्हॉईस आणि दैनंदिन डेटा प्लॅनमध्ये दर समायोजित केले आहेत. सर्व प्लॅन्सच्या किमती १० ते २१ टक्क्यांनी वाढवल्या आहेत. यापूर्वी ४५५ रुपयांमध्ये ८४ दिवसांचा प्लान होता, पण आता कंपनीने तो काढून टाकला आहे. याशिवाय, ३६५ दिवसांची वैधता असलेला १७९९ रुपयांचा प्लॅन देखील काढून टाकण्यात आला आहे.
रिलायन्स जिओने आजपासून आपल्या प्लॅनच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन १५५ रुपयांऐवजी १८९ रुपयांचा झाला आहे. जिओने प्लॅनमध्ये २२ टक्के वाढ केली आहे. २८ दिवसांसाठी २ जीबी डेटा असलेला एअरटेलचा बेसिक प्लॅन १७९ रुपयांऐवजी १९९ रुपयांना केला आहे. ६ जीबी डेटा देणारा ८४ दिवसांचा प्लॅन ४५५ रुपयांवरून ५०९ रुपयांपर्यंत वाढला आहे. वार्षिक प्लॅन २४ जीबी डेटा आहे तो १७९९ रुपयांवरून १९९९ रुपयांपर्यंत वाढला आहे.