

नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी इलेक्ट्रिक शॉक देणारी उपकरणे आणि पेलेट गन्ससह बळाचा अतिवापर केला, असे 'ॲम्नेस्टी इंटरनॅशनल'ने अहवालात म्हटले. हा अहवाल पोलिसांच्या दाव्याशी विसंगत आहे. आंदोलक हिंसक झाल्यानंतरच बळाचा वापर केला गेला, असे पोलिसांनी म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आणि आंदोलक या दोघांकडून झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी गुरुवारी एका समितीची स्थापना केल्यानंतर हा अहवाल आला आहे. ॲम्नेस्टीने अहवालात म्हटले आहे की, त्यांनी पडताळलेल्या प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी आणि दृश्य पुराव्यांवरून दिल्ली आणि बिहारमध्ये आंदोलकांविरोधात "पेलेट-फायरिंग शॉटगन्स, अश्रूधुराची नळकांडी, लाठ्या आणि इलेक्ट्रिक शॉक देणारी उपकरणे" वापरल्याची पुष्टी झाली आहे. बिहारच्या सिवान जिल्ह्यात एका पोलीस अधिकाऱ्याने "गर्दीवर बेकायदेशीरपणे जीवघेण्या बळाचा वापर" केल्याच्या दोन घटनांचीही पडताळणी केल्याचे ॲम्नेस्टीने सांगितले.
आंदोलनामध्ये यात कोणाचाही मृत्यू झाला नाही, असे अहवालात म्हटले आहे. "पोलिसांनी शस्त्रे अशा प्रकारे वापरली गेली ज्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदा व मानके तसेच देशांतर्गत पोलीसिंग मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले," असेही त्यात नमूद केले आहे. ॲम्नेस्टीने म्हटले की, "निदर्शकांकडून दगडफेक झाल्याच्या काही तुरळक घटना" घडल्या होत्या, परंतु "पोलिसांची कठोर कारवाई ही गर्दीवर नियंत्रण मिळवण्याच्या नावाखाली केलेली सरकारी-मान्यताप्राप्त हिंसा होती."
अहवालात म्हटले आहे की, नाव न सांगण्याच्या अटीवर अॅम्नेस्टी इंटरनॅशनलशी बोलताना, छऱ्यांमुळे जखमी झालेल्या एका आंदोलकाने सांगितले: “मी कनॉट प्लेसजवळ होतो आणि आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. तरीही, बहुतेक आंदोलन शांततापूर्ण राहिले. आरएएफचे अधिकारी अश्रुधूर वापरत होते, पण नंतर, कोणतीही पूर्वसूचना न देता, त्यांनी पेलेट झाडणाऱ्या शॉटगनचा वापर सुरू केला.
माझ्यापासून ३००-४०० मीटर अंतरावर उभ्या असलेल्या एका अधिकाऱ्याला, मी जिथे उभा होतो त्या दिशेने शॉटगन रोखताना पाहिले. मी विरुद्ध दिशेने पळू लागलो आणि त्याच वेळी माझ्या पाठीवर पेलेट लागला. मला अंदाजे २५-३० जखमा झाल्या होत्या आणि मी तात्काळ रुग्णालयात गेलो. डॉक्टरांनी त्या पेलेटमुळे झालेल्या जखमा असल्याचे सांगितले. सुदैवाने, माझी हाडे वाचली आहेत, पण माझ्या शरीरावर गंभीर व्रण उमटले आहेत.”