पुढारी ऑनलाईन डेस्क: जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील घनदाट जंगलात रविवारी (दि.११ ऑगस्ट) पहाटे भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीनंतर दुसऱ्या दिवशी ही चकमक झाली. सध्या सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. दरम्यान दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी लष्कर आणि निमलष्करी दलाच्या मदतीने नौनट्टा, नागेनी प्यास आणि आसपासच्या परिसरात शोध मोहीम सुरू केली. काही वेळाने चकमक सुरू झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला.
सध्या या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग जंगलात झालेल्या भीषण चकमकीत दोन लष्करी जवान, हवालदार दीपक कुमार यादव आणि लान्स नाईक प्रवीण शर्मा शहीद आणि दोन नागरिकांसह सहा जण जखमी झाल्याच्या एका दिवसानंतर ही चकमक झाली.
दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग भागातील दुर्गम जंगल परिसरात शनिवारी (दि.१० ऑगस्ट) संध्याकाळी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले. दोन नागरिक आणि चार जवानांसह सहा जण जखमी झाले. दहशतवादी घटनास्थळावरून पळून जाऊ नयेत म्हणून सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. मात्र, सध्या सैनिक जखमी झाल्याचे लष्कर सांगत आहे.