

Jaipur School Girl Death Video
जयपूर: येथील नामांकित 'नीरजा मोदी स्कूल'मध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात चौथीतील विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवल्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. आता या प्रकरणात एक नवा आणि धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
विद्यार्थीनीच्या पालकांनी घटनेच्या काही वेळ आधीचे वर्गातील सीसीटीव्ही फुटेज जाहीर केले आहे. या फुटेजवरून तिच्या वर्गमित्रांकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता आणि तिने शिक्षकांकडे वारंवार केलेली मदतीची विनंती पूर्णपणे धुडकावून लावण्यात आली, असा गंभीर आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी पोलीस ढिसाळ तपास करत असून शाळा प्रशासन व शिक्षकांवर बाल न्याय कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
पालकांनी जाहीर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, घटना घडण्यापूर्वी वर्गातील घडामोडी स्पष्ट दिसत आहेत. सुरुवातीला अमायरा नेहमीप्रमाणे वर्गात जाते, मैत्रिणीला भेटते आणि इतर मुलांसोबत डान्सच्या तासातही सहभागी होते. मात्र, काही वेळाने वर्गात काही मुले एक डिजिटल स्लेट घेऊन येतात. या फुटेजच्या पार्श्वभूमीवर पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही मुलांनी ती डिजिटल स्लेट पीडित विद्यार्थीनीला वारंवार दाखवून तिची छेड काढली. त्यानंतर तिचा चेहरा पूर्णपणे बदलला आणि ती अस्वस्थ, घाबरलेली फुटेजमध्ये दिसत आहे.
घाबरलेली विद्यार्थीनी वर्गशिक्षिकेकडे वारंवार जाताना दिसते. मात्र, शिक्षिकेने तिचे वैयक्तिक म्हणणे ऐकून घेण्याऐवजी किंवा तिला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याऐवजी, इतर मुलांच्या सांगण्यावरून तिलाच धमकावल्याचा आरोप होत आहे. व्हिडिओमध्ये विद्यार्थीनी अत्यंत चिंतेत असून, ती हात जोडून शिक्षिकेला काहीतरी समजावण्याचा प्रयत्न करत आहे. कधी ती भीतीने तोंडावर हात ठेवते, तर कधी डोक्याला हात लावून अगतिकता व्यक्त करते. मात्र, शिक्षिकेची वर्तणूक अत्यंत कठोर आणि भीतीदायक असल्याचे फुटेजमध्ये जाणवते. त्यानंतर काहीच क्षणांत विद्यार्थीनी रडत वर्गाबाहेर पळत जाते. ती वर्गाबाहेर जात असताना कोणत्याही शिक्षकाने किंवा कर्मचाऱ्याने तिला थांबवण्याचा किंवा तिचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला नाही.
१ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेत विद्यार्थीनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरील रेलिंगवरून तब्बल ४८ फूट खाली उडी मारली होती. रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. "आम्ही न्यायासाठी पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत आहोत, पण आमचे फोन घेणे बंद केले आहे. आतापर्यंत तीन तपास अधिकारी बदलले, तरीही शाळा प्रशासनाविरुद्ध योग्य कलमे लावण्यात आलेली नाहीत. प्राचार्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे," असा संताप मृत विद्यार्थीनीच्या आईने व्यक्त केला.