

नवी दिल्ली : मुंबईच्या इंदू मिलमधील आंतरराष्ट्रीय स्मारकात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम 45 ते 50 टक्के पूर्ण झाले आहे. 2027 अखेरपर्यंत पुतळ्याचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली.
बनसोडे यांनी प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांच्या गाझियाबाद येथील कारखान्यात सुरू असलेल्या आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याच्या कामाची पाहणी केली. या पुतळ्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. मात्र, विविध धातूंचा वाढता खर्च पाहता पुतळ्याचे काम लांबण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये यासाठी राज्य सरकारला कालबद्ध पद्धतीने काम करावे लागणार आहे. तसेच वाढीव निधीची तरतूद करावी लागणार आहे, असे ते म्हणाले.
बनसोडे म्हणाले की, 2018 साली या पुतळ्याच्या उभारणीचे कंत्राट राम सुतार यांच्या कारखान्याला देण्यात आले होते. मात्र, 2026 पर्यंत या प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाल्याने शासनाने किमतीतील तफावत तातडीने कंत्राटदाराला देण्याची गरज आहे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पातील आर्थिक तफावत दूर करण्यासोबतच एमएमआरडीएकडून कंत्राटदारांना वेळेत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.
बनसोडे यांनी शिष्टमंडळासह उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चैत्यभूमी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती बनसोडे यांनी केली. बनसोडे यांच्या या विनंतीला उपराष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद देत तत्काळ होकार दर्शवला.
पुतळ्याचे काम प्रगतिपथावर असले, तरी अपेक्षित वेळेत पुतळा पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. बनसोडे म्हणाले की, या धातूंचा पूर्वीचा दर आणि आजचा दर यात मोठी तफावत आहे. ब्राँझचा भाव आधीपेक्षा दुपटीने वाढला आहे. कॉपरचा भावही वाढला आहे. ही तफावत मोठी आहे. ही तफावत भरून काढली तर काम अधिक गतीने करता येईल. यासाठी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, सामाजिक न्यायमंत्री आणि सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक घेतल्यानंतर दराच्या तफावतीबद्दल निर्णय करता येईल. मुख्यमंत्री यावर योग्य तोडगा काढतील.