

नवी दिल्ली : अमेरिकेला जाणारी टपाल सेवा भारताने स्थगित केली असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली. २५ ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेसाठी जाणारी टपाल सेवा तात्पुरती स्थगित असेल, असे केंद्र सरकारने म्हटले. अमेरिकेच्या कस्टम विभागाने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे हवाई वाहतूक कंपन्यांनी शिपमेंट वाहून नेण्यास नकार दिला आहे. अमेरिकेच्या नवीन नियमांमुळे भारताने टपाल सेवा स्थगितीचे पाऊल उचलले आहे. ही स्थगिती तात्पुरती असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. तथापि, १०० अमेरिकन डॉलर्सपर्यंतची पत्रे, कागदपत्रे आणि भेटवस्तूंसाठी टपाल सेवा सुरू राहतील.
अमेरिका प्रशासनाने ३० जुलै २०२५ रोजी जारी केलेल्या कार्यकारी आदेशाची भारताच्या टपाल विभागाने नोंद घेतली आहे. या आदेशानुसार, ८०० अमेरिकन डॉलर पर्यंतच्या वस्तूंवरील शुल्कमुक्त सवलत २९ ऑगस्ट पासून बंद करण्यात येणार आहे. परिणामी, किंमत काहीही असो, अमेरिकेसाठी पाठविण्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय टपाल वस्तूंवर त्या देशाच्या आयईईपीए ( आंतरराष्ट्रीय आपत्कालीन वित्तीय अधिकार कायदा ) दररचनेनुसार सीमा शुल्क आकारले जाणार आहे. तथापि, १०० अमेरिकन डॉलर पर्यंतच्या भेटवस्तूंना शुल्कातून सूट लागू राहील.
कार्यकारी आदेशानुसार, आंतरराष्ट्रीय टपाल जाळ्याद्वारे मालवाहतूक करणारे परिवहन वाहक किंवा यूएससीबीपी ( अमेरिकन अबकारी आणि सीमा संरक्षण) मान्यताप्राप्त पात्र संस्था यांना टपाल पार्सलवरील शुल्क वसूल करून जमा करण्याची जबाबदारी आहे. यूएससीबीपी ने १५ ऑगस्ट २०२५ रोजी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या असल्या तरी पात्र संस्थांची नेमणूक तसेच शुल्क वसुली आणि रेमिटन्स यंत्रणा अद्याप स्पष्ट झालेली नाही. परिणामी, कार्यात्मक तसेच तांत्रिक तयारीअभावी, अमेरिकेकडे जाणाऱ्या हवाई कंपन्यांनी २५ ऑगस्ट २०२५ नंतर टपाल पार्सल स्वीकारण्यास असमर्थता व्यक्त केली आहे, असे केंद्र सरकारने म्हटले.
टपाल विभाग या बदलत्या परिस्थितीवर सर्व संबंधित हितधारकांशी समन्वय साधत सतत लक्ष ठेवून आहे आणि सर्व सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले. ज्या ग्राहकांनी अशा वस्तूंचे बुकिंग आधीच केले आहे, त्या सद्यस्थितीत अमेरिकेला पाठविता येणार नाही, ते ग्राहक टपाल शुल्क परत घेऊ शकतात. तसेच टपाल विभाग ग्राहकांना झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करून अमेरिकेला जाणारी पूर्ण टपाल सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करीत आहे,असे टपाल विभागाने कळवले आहे.