

India Monsoon Rainfall Deficit: जून महिना अर्धा संपत आला आहे. साधारणपणे याच काळात देशभरात मुसळधार पावसाची सुरुवात झालेली असते. नद्या, ओढे भरू लागतात, शेतकरी पेरणी करतात आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेला दिलासा मिळतो. मात्र यंदा चित्र काहीसे वेगळे दिसत आहे. दक्षिण-पश्चिम मॉन्सूनने भारतात वेळेत प्रवेश केला असला तरी अचानक त्याची गती मंदावली आहे. इतकेच नव्हे तर सॅटेलाइट चित्रांमध्येही देशाच्या मोठ्या भागावर ढग अत्यंत कमी दिसत आहे.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार 4 जून ते 15 जून या कालावधीत देशभरात केवळ 19.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या काळात सरासरी 53.7 मिमी पाऊस अपेक्षित होता. म्हणजेच देशात तब्बल 64 टक्के पावसाची तूट आहे. यामुळे खरीप हंगाम, जलसाठे आणि पिण्याच्या पाण्याबाबत चिंता वाढू लागली आहे.
15 जून रोजी INSAT-3DS या भारतीय उपग्रहाने टिपलेल्या फोटोंमध्ये मध्य भारत, दक्षिण भारत आणि द्वीपकल्पीय भाग मोठ्या प्रमाणावर ढगविरहित दिसून आले. साधारणपणे जून महिन्यात देशाचा मोठा भाग पांढऱ्या ढगांच्या आच्छादनाखाली असतो. मात्र यंदा अनेक भाग कोरडे आणि स्वच्छ दिसत असल्याने हवामानतज्ज्ञही चिंतेत आहेत.
IMD च्या रेनफॉल डिपार्चर नकाशात मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतातील अनेक भाग लाल आणि पिवळ्या रंगात दाखवण्यात आले आहेत. हे रंग कमी पाऊस आणि संभाव्य दुष्काळसदृश परिस्थिती दर्शवतात.
सर्वात मोठा प्रश्न असा आहे की काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात वेळेत दाखल झालेला मॉन्सून अचानक गायब कसा झाला?
हवामानतज्ज्ञांच्या मते यामागे समुद्रातील आर्द्रतेची कमतरता नाही. अरब सागर आणि बंगालच्या उपसागरात पुरेशी आर्द्रता उपलब्ध आहे. मात्र वातावरणाच्या वरच्या स्तरांवर वाहणाऱ्या वाऱ्यांच्या असामान्य हालचालींमुळे मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला आहे.
सध्या वातावरणाच्या वरच्या थरात वाहणारी ‘वेस्टरली जेट स्ट्रीम’ म्हणजेच पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांची पट्टी नेहमीपेक्षा दक्षिणेकडे सरकली आहे. या वाऱ्यांमुळे मॉन्सूनला बळ देणाऱ्या ‘ईस्टरली जेट स्ट्रीम’च्या कार्यात अडथळा निर्माण होत आहे.
सामान्य परिस्थितीत पूर्वेकडील वारे वरच्या दिशेने हवा खेचतात. त्यामुळे ढग तयार होतात आणि पाऊस पडतो. मात्र यंदा पश्चिमेकडील वाऱ्यांचा दबाव इतका वाढला आहे की ढगांची निर्मिती आणि त्यांचा विस्तार थांबला आहे. त्यामुळे समुद्रावर भरपूर ढग आणि आर्द्रता असूनही ते भारताच्या मुख्य भूभागावर पोहोचून पाऊस पाडू शकत नाहीत.
मॉन्सूनमधील या खंडामुळे सर्वाधिक चिंता शेतकऱ्यांना लागली आहे. खरीप हंगामातील पेरणी मोठ्या प्रमाणात पावसावर अवलंबून असते. अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी केली असली तरी पावसाअभावी त्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
जर ही परिस्थिती आणखी काही दिवस कायम राहिली, तर सोयाबीन, कापूस, भात आणि डाळींच्या लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
हवामान विभाग आणि तज्ज्ञांनी काहीसा दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान मॉडेल्सनुसार सध्या सक्रिय असलेली पश्चिमेकडील जेट स्ट्रीम पुढील काही दिवसांत कमकुवत होऊ शकते.
जर तसे झाले, तर मॉन्सून पुन्हा सक्रिय होईल आणि जूनच्या शेवटच्या आठवड्यात मध्य भारत, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतातील अनेक भागांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता निर्माण होईल.
सध्या मॉन्सून पूर्णपणे गायब झालेला नाही, तर तो तात्पुरत्या विश्रांतीच्या अवस्थेत असल्याचे हवामानतज्ज्ञांचे मत आहे. मात्र या विश्रांतीचा कालावधी जितका वाढेल तितकी चिंता वाढणार आहे.
आता संपूर्ण देशाचे लक्ष जूनच्या उत्तरार्धाकडे लागले असून, मॉन्सूनची दुसरी फेरी कधी सुरू होते याची उत्सुकता शेतकरी, प्रशासन आणि सामान्य नागरिकांना आहे.