

स्टॉकहोम : भारताने प्रथमच आपली 12 अण्वस्त्रे प्रत्यक्ष सैन्यासह तैनात केली आहेत. यापूर्वीच्या अहवालात भारताकडे एकही तैनात अण्वस्त्र नसल्याचे म्हटले होते. हा बदल भारताच्या अण्वस्त्र धोरणातील एका मोठ्या रणनीतिक बदलाचा संकेत देतो. भारत आता समुद्रातून शत्रूवर अण्वस्त्रांद्वारे मारा करण्याच्या क्षमतेवर अधिक भर देत आहे, असे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट या जागतिक नामांकित संस्थेने वार्षिक अहवालात म्हटले आहे.
सिप्रीच्या ‘इयरबुक 2026’ नुसार, भारताने आपल्या एका बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडीवर काही अण्वस्त्रे तैनात करण्यास सुरुवात केली आहे, ती सध्या समुद्रात गस्त घालत आहे. शांततेच्या काळात भारत आपली अण्वस्त्रे आणि क्षेपणास्त्रे वेगवेगळी ठेवतो, असा आजवरचा समज होता. मात्र, आधुनिक कॅनिस्टर क्षेपणास्त्रांचा वाढता वापर आणि सागरी गस्तीमुळे, भारत आता शांततेच्या काळातही अण्वस्त्रे आणि त्यांचे लाँचर्स एकत्र जोडण्याच्या दिशेने पावले टाकत असल्याचे दिसते. जानेवारी 2026 पर्यंत भारताकडे एकूण 190 अण्वस्त्रे असल्याचा अंदाज आहे, जी गेल्या वर्षी 180 इतकी होती.
भारताचा हा अण्वस्त्र आधुनिकीकरण कार्यक्रम प्रामुख्याने चीनमधील दूरवरच्या लक्ष्यांपर्यंत पोहोचू शकतील अशा लांब पल्ल्याच्या यंत्रणा विकसित करण्यावर केंद्रित आहे. त्याचवेळी नवी दिल्लीचे आण्विक नियोजन अजूनही पाकिस्तानसोबतच्या जुन्या वादाने प्रभावित आहे. भारताने ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्राच्या माध्यमातून एमआयआरव्ही म्हणजेच एकाच क्षेपणास्त्रातून एकापेक्षा जास्त अण्वस्त्रे डागण्याचे तंत्रज्ञान यशस्वीपणे विकसित केले आहे.
पाकिस्तान : पाकिस्तानकडे अण्वस्त्रांची संख्या 170 वर स्थिर आहे. मात्र, त्यांचे सागरी अण्वस्त्र तंत्रज्ञान अजूनही चाचणीच्या टप्प्यात आहे.
चीन : चीन आपले अण्वस्त्र भांडार जगात सर्वाधिक वेगाने वाढवत आहे. चीनकडे सध्या 620 अण्वस्त्रे असून, त्यातील 34 अण्वस्त्रे तैनात आहेत. चीनकडे अमेरिका आणि रशियापेक्षाही जास्त आयसीबीएम (ICBM) लाँचर्स आहेत.
वैश्विक स्थिती : जानेवारी 2026 पर्यंत जगात एकूण 12,187 अण्वस्त्रे अस्तित्वात असून, त्यातील 4,012 अण्वस्त्रे सैन्यासह तैनात आहेत.
1) सिप्री (SIPRI) च्या अहवालानुसार भारताने पहिल्यांदाच आपल्या ताफ्यातील 12 अण्वस्त्रे प्रत्यक्ष कारवाईसाठी तैनात केली आहेत.
2) जानेवारी 2026 पर्यंत भारताची एकूण अण्वस्त्र संख्या वाढून 190 वर पोहोचली आहे, जी गेल्या वर्षी 180 होती.
3) भारताचे अण्वस्त्र धोरण आता शांततेच्या काळातही क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्रे एकत्र जोडण्याच्या आधुनिक दिशेने सरकत आहे.
4) भारताच्या ‘अग्नी-5’ क्षेपणास्त्राने एकाच वेळी 3 अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता सिद्ध केली असून हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांवरही काम सुरू आहे.