

India Iran Relations |
नवी दिल्ली : इराणच्या नौदलाचे जहाज 'आयआरआयएस लावन' (IRIS Lavan) सध्या कोची बंदरात थांबण्यास भारताने परवानगी दिली आहे. या निर्णयाबद्दल अधिक माहिती देताना परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आज (दि. ९) संसदेत सांगितले की, हे जहाज कोचीमध्ये थांबवून घेणे ही मानवतावादी भूमिकेतून घेतलेली योग्य कृती होती. मध्यपूर्वेतील सध्याची तणावपूर्ण परिस्थिती पाहता, हा निर्णय घेणे काळाची गरज होती. राज्यसभा आणि लोकसभा अशा दोन्ही सभागृहांना त्यांनी या घडामोडींची माहिती दिली.
परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी संसदेत स्पष्ट केले की, २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केल्यानंतर, इराणने आपल्या तीन जहाजांसाठी भारताकडे आश्रय मागितला होता. भारताने १ मार्च रोजी ही परवानगी दिली आणि त्यानुसार ४ मार्चपासून 'आयआरआयएस लावन' हे जहाज कोची बंदरात दाखल झाले आहे. या जहाजावरील १८३ कर्मचाऱ्यांची सोय भारतीय नौदलाच्या केंद्रात करण्यात आली असून, कठीण काळात केलेली ही मदत 'योग्य पाऊल' असल्याचे जयशंकर यांनी म्हटले आहे; तसेच इराणनेही भारताच्या या मानवतावादी भूमिकेबद्दल आभार मानले आहेत.
इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत भारताचे आभार मानले.अमेरिकन सैन्याने आयआरआयएस देना हे इराणी नौदलाचे जहाज बुडवल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की इराणचे आणखी एक नौदल जहाज आयआरआयएस लावन तांत्रिक आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी कोची बंदरात आले आहे. या जहाजाला बंदरात थांबण्याची परवानगी देण्यासाठी आणि जहाजावरील कर्मचाऱ्यांना मदत केल्याबद्दल भारत सरकार आणि स्थानिक अधिकाऱ्यांचे त्यांनी मनापासून आभार मानले.