नवी दिल्ली; वृत्तसंस्था : नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने (एनसीईआरटी) बारावीच्या इतिहास, नागरिकशास्त्र आणि हिंदी या विषयांच्या अभ्यासक्रमात बदल केला आहे. इतिहासातून मोगल साम्राज्याशी संबंधित प्रकरण हटवण्यात आले आहे.
स्वतंत्र भारताचे राजकारण या पुस्तकातून जन आंदोलनाचा उदय आणि एका पक्षाच्या वर्चस्वाचा कालखंड हे धडे हटवण्यात आले आहेत. यात काँग्रेसचे वर्चस्व, समाजवादी, कम्युनिस्ट पक्ष आणि सीपीआय, भारतीय जनसंघ आदींबाबतची माहिती होती. अकरावीच्या थीम्स इन वर्ल्ड हिस्ट्रीमधून सेंट्रल इस्लामिक लँडस, संस्कृतींचा संघर्ष आणि द इंडस्ट्रियल रिव्होल्यूशनसारखे धडे हटवण्यात आले आहेत. दरम्यान या निर्णयावर विरोधकांनी अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नसली तरी अधिवेशनाच्या उर्वरित काळात त्यावर प्रतिक्रिया उमटू शकतात.
अभ्यासक्रमातील हा बदल देशभरातील एनसीईआरटीच्या पुस्तकांचा समावेश असलेल्या सीबीएसई, यूपीसह सर्व स्टेट बोर्डाच्या पुस्तकांचा समावेश असेल. अभ्यासक्रमातील हे बदल शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून लागू होतील.