

पुढारी ऑनलाईन डेस्क: झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून आज (दि.४ जुलै) शपथ घेतली. झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी हेमंत सोरेन यांना पदाची व गोपनियतेची शपथ दिली. रांची येथील राजभवनात हा शपथविधी पार पडला. हेमंत सोरेन हे झारखंडच्या स्थापनेपासून २३ वर्षातले १३ वे मुख्यमंत्री ठरले आहेत. ( Hemant Soren Oath Taking Ceremony )
२०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. यानंतर भाजपचे नेते अर्जुन मुंडा केंद्रात मंत्री झाले. २०१९ ला झालेल्या निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडी सरकारचा विजय झाला. मात्र जमीन घोटाळा प्रकरणी अटक झाल्याने हेमंत सोरेन यांच्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद सोडण्याची नामुष्की ओढवली. बुधवार, ३१ जानेवारी रोजी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सक्तवसुली संचालनालयाने जमीन घोटाळा प्रकरणी अटक केली हाेती.
झारखंड जमीन घोटाळा प्रकरणात हेमंत सोरेन यांना अटक झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांचे बंधू चंपाई सोरेन यांनी २ फेब्रुवारी, २०२४ रोजी झारखंडचे १२ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ५ महिन्यांनंतर हेमंत सोरेन यांची २८ जून,२०२४ रोजी तुरुंगातून सुटका झाली. त्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी बुधावरी (दि. ४ जुलै) मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोरेन यांनी झारखंडचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. सोरेन आज झारखंडचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध झाले आहेत. अशाप्रकारे राज्यात गेल्या २३ वर्षात तब्बल १३ मुख्यमंत्री झाले आहेत.
२०१४पर्यंत झारखंडमधील जनतेने पाच मुख्यमंत्री आणि ९ वेळा सरकार स्थापन झाल्याचे पाहिले. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. त्यामुळे राज्यात स्थिर सरकार आले. भाजपचे रघुबर दास हे मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांच्या कार्यकाळ पूर्ण करणारे ते झारखंडचे पहिले आणि एकमेव (आतापर्यंत) मुख्यमंत्री ठरले.
झारखंडमध्ये सोरेन कुटुंबाचीच घराणेशाही आहे. शिबू यांचे सर्वात मोठे चिरंजीव दुर्गा हे आमदार होते. 2009 मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी सीता या आमदार झाल्या. याच घराण्यातील वसंत सोरेन हे झारखंड युवा मोर्चाचे अध्यक्ष असून, ते आमदारही आहेत. हेमंत यांच्यावर जमीन घोटाळा केल्याचा आरोप असून, त्यांच्याकडून आलिशान मोटार आणि 36 लाख रुपयांची रोकडही जप्त केली गेली. ईडीकडून चौकशीसाठी दहा वेळा समन्स पाठवूनही ते दरवेळी चौकशीला सामोरे जाण्याचे टाळत होते. नोव्हेंबर 2021 मध्ये त्यांच्या विरोधात बेकायदेशीर खननाचा गुन्हा नोंदवण्यात आला. शिवाय रांचीमधील लष्कराची जमीन घेऊन ती विकण्याच्या प्रकरणातही त्यांच्यावर आरोप आहे.