पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 'सत्संग' कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणानंतर आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. यात आता अयोध्येतील राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी उडी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणाला आयोजकांना जबाबदार ठरविले आहे. ते आज (दि.६) पत्रकारांशी बोलत होते.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 'सत्संग' कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरी
सत्येंद्र दास यांची हाथरस चेंगराचेंगरीप्रकरणी प्रतिक्रिया
दुर्घटनेनंतर सुरज पाल उर्फ भोले बाबा भूमिगत
या प्रकरणाला आयोजकांना जबाबदार ठरविले पाहिजे.
ते पुढे म्हणाले की, अशा कार्यक्रमांची जबाबदारी आयोजकांनी घेतली पाहिजे. ज्यांनी 'सत्संग'चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यांनी त्यावेळी घडणाऱ्या घटनांची जबाबदारी घेतली पाहिजे. त्यांनी घडलेल्या दुर्घटनेची जबाबदारी घेऊन पुढे येऊन आपला गुन्हा स्वीकारला पाहिजे. दुर्घटनेनंतर सुरज पाल उर्फ भोले बाबा भूमिगत झाले होते. आता ते सांगत आहेत की, त्यांना या दुःखद घटनेने दु:ख झाले आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, असेही सत्येंद्र दास म्हणाले.
दरम्यान, धर्मोपदेशकाच्या पायाजवळून आशीर्वाद घेण्यासाठी आणि माती गोळा करण्यासाठी भाविक गर्दी करत असताना चेंगराचेंगरी झाली. परंतु, त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना असे करण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक लोक खाली पडले आणि घटनास्थळी गोंधळ उडून चेंगराचेंगरी झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना २ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.