

Unusual Wedding Incident Hapur: युपीमधील हापुड मधून एक धक्कादायद बातमी समोर आली आहे. इथं एका लग्नानंतरची मधुचंद्राची रात्र एका भीतीदायक वातावरणात रूपांतरित झाली. नववधूने थेट वराला धमकी दिली. जर त्याने तिला हात लावला तर ती त्याचा मुडदा पाडणार. इकडं वर देखील घाबरून गेला होता. त्याने थेट धाडसी पाऊल उचललं. त्याने थेट नववधूच्या प्रेमीला बोलवून घेतलं अन् नववधूला त्याच्यासोबत पाठवलं. या प्रकरणाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
हम दिल दे चुके सनम या चित्रपटात देखील असंच सलमानवर प्रेम करणारी ऐश्वर्याचे बळजबरीने अजय देवगणसोबत लग्न लावून दिलं जातं. मात्र अजय देवगण ऐश्वर्याच्या सुखासाठी तिला तिचा प्रेमी सलमान खानकडे नेऊन सोडतो. तोच कित्ता या वरानं देखील गिरवला.
हापुड मधील एका युवकाचे लग्न मेरठमधील एका युवतीशी झाला. लग्नानंतरच्या मधुचंद्राच्या रात्री नवविवाहितेने सांगितलं की ती दुसऱ्या कोणाची तरी अमानत आहे. जर मला हात लावलास तर तुला मारून टाकणार अशी धमकी देखील दिली. हे ऐकल्यावरच पती हादरला. त्याने नवविवाहितेच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती दिली. त्यांनी खास काही प्रतिक्रिया दिली नाही. शेवटी त्या पतीने तीन दिवसांनी युवतीच्या प्रेमीला बोलवून घेतलं आणि आपल्या नववधूला त्याच्या सुपूर्द केलं. यानंतर या युवकाने पोलीस ठाणे गाठून घडल्या प्रकाराची माहिती दिली.
पोलीस ठाण्यात शुक्रवारी पोहचलेल्या युवक आणि त्याच्या पित्यानं सांगितलं की त्यांनी मेरठच्या एका गावातील युवतीशी आपल्या मुलाचं लग्न २५ जून २०२६ रोजी केलं होतं. मात्र मधुचंद्राच्या रात्री नववधूने मोठा दंगा घातला. त्यावेळी तिच्या माहेरकडच्यांनी तिला इकडे सोडून जावा असं उत्तर दिलं. मात्र तरूणाने असं न करण्याचा निर्णय घेतला. त्याने २८ जून रोजी पत्नीला तिच्या प्रेमीसोबत पाठवून दिलं.
या प्रकरणी महिला पोलीस ठाण्याच्या प्रभारी अरूणा राय यांनी सांगितलं की, नववधू दुसऱ्या कोणाशी तरी प्रेम करत होती. तिच्या घरच्यांनी तिचे लग्न हापुडमधील युवकाशी करून दिलं. भविष्यात या प्रकरणी वेगळं काही होऊ नये म्हणून तरूणाने पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत माहिती दिली आहे. ती नववधू आता आपल्या प्रेमी सोबत गेली असून दोन्ही पक्षांनी हे प्रकरण शांततेत संपवलं आहे.