

पुढारी ऑनलाईन डेस्क
गुजरात (Gujarat Rains) आणि सौराष्ट्र प्रदेशात मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. येथे पावसाशी संबंधित घटनांमध्ये ३ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर सुमारे २० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गुजरातच्या अनेक भागात २९ ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात एनडीआरएफच्या पथकांकडून बचावकार्य सुरु आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अपडेटेड बुलेटिननुसार, २९ ऑगस्टच्या सकाळपर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसाने बनासकांठा, साबरकांठा, अहमदाबाद, अरवली, खेडा, अहमदाबाद, आनंद, पंचमहाल, दाहोद, महिसागर, वडोदरा (Vadodara rain update), छोटा उदेपूर, डांग, तापी, सुरत, नर्मदा, भरूच, नवसारी, वलसाड आणि दमण आणि दादरा आणि नगर हवेली, अमरेली, भावनगर, मोरबी, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, जुनागढ, द्वारका, बोताड आणि कच्छ हे जिल्हे प्रभावित झाले आहेत. यापैकी बहुतांश जिल्ह्यांसाठी ३० आणि ३१ ऑगस्ट रोजी ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे IMD कडून सांगण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, वायव्य मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानवरील वादळी प्रणालीच्या (deep depression) निर्मितीमुळे गुजरातमध्ये अतिवृष्टी होत आहे, ज्याची तीव्रता वाढली आहे.
दक्षिण गुजरातमध्ये हंगामातील सरासरी वार्षिक १०५ टक्के आणि कच्छमध्ये ९५.८ टक्के पाऊस पडला आहे. तर मध्य, उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये ७७ टक्के, ७०.७४ टक्के आणि ९१ टक्के पावसाची नोंद झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली आहे.
गुजरातचे मदत आयुक्त आलोक कुमार पांडे यांनी सांगितले, "आतापर्यंत १,६५३ लोकांना वाचवण्यात आले आणि १७,८०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. संपूर्ण पावसाळ्यात ९९ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३ मृत्यू झाले आहेत. दाहोदमध्ये १ आणि गांधीनगर जिल्ह्यात २ मृत्यूची नोंद झाली आहे."