

Abhinandan Varthaman Quits IAF: भारताचे वीर ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांनी भारतीय वायू सेनेला रामराम ठोकला आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अभिनंदन हे वायू सेनेचे नोकरी सोडून खासगी एअरलाईन्ससोबत काम करणार आहेत असे वृत्त आहे. २०१९ मध्ये बालाकोट एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे एफ १६ विमान पाडल्यानंतर वर्धमान हे चर्चेत आले होते.
हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार वर्धमान यांनी भारतीय वायू सेना सोडली असून नाव न छापण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी सांगितलं की भारतीय हवाई दलाला ३१ मार्च रोजी रामराम क्ला आहे. ते आता एफएलवाय ९१ सोबत काम करणार आहेत. असं असलं तरी अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. भारतीय वायू सेनेने देखील याची घोषणा केलेली नाही.
एफएलवाय ९१ च्या प्रवक्त्यांनी याबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला आहे. त्यांनी ही कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक माहीतीचा विषय आहे असे स्पष्टीकरण दिलं. एअरलाईनमध्ये वर्धमान यांची काय भूमिका असणार याबाबत मात्र अजून माहिती मिळालेली नाही.
गोव्यातील या एफएलवाय ९१ कंपनीने मार्च २०२४ मध्ये आपली उड्डाणे सुरू केली आहेत. सध्या त्यांच्या ताफ्यात सहा एटीआर ७२-६०० विमाने आहेत. याची दोन केंद्रे गोवा आणि हैदराबादमध्ये आहेत.
२०१९ मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायू सेनेच्या मिराज २००० ने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये अनेक ठिकाणांवर हल्ला केला होता. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी ४० सीआरपीएफ जवानांची हत्या केली होती. यानंतर प्रत्युत्तरात केलेल्या कारवाईवेळी भारताचे ३५ वर्षाचे विंग कमांडर वर्धमान हे मिग २१ बायसन उडवत होते. त्यांनी पाकिस्तानचे एफ १६ हे अत्याधुनिक विमान पाडले.
मात्र या कारवाईत त्यांचे देखील विमान क्रॅश झाले अन् वर्धमान हे पाकिस्तानी हद्दीत पोहचले. त्यावेळी पाकिस्तानने त्यांना पकडलं होतं. मात्र भारत आणि आंतरराष्ट्रीय दबावानंतर अवघ्या ६० तासात पाकिस्तानी लष्कराने वर्धमान यांना भारताकडे सुपूर्द केलं.
२०२१ मध्ये वर्धमान यांना वीर चक्रने सन्मानित करण्यात आलं होतं. युद्धाच्या काळात देण्यात येणारा हा भारताचा तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. त्यांच्या पुरस्काराच्या प्रशस्ती पत्रावर हवाई कारवाईवेळी कर्तव्याप्रती असाधारण समर्पणासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे असा उल्लेख करण्यात आला होता.