

हैदराबाद : वृत्तसंस्था
'जेन झी' ही पिढी अत्यंत भावुक आणि परिस्थितीनुसार जुळवून घेणारी आहे; परंतु ती शांत मनाने विचार करत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी येथील एका कार्यक्रमात व्यक्त केले.
युवा पिढीच्या स्वभावाचे विश्लेषण करताना भागवत म्हणाले, 'जेन झी' ही पिढी चांगली आहे. त्यांच्यात परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आहे आणि ते स्वभावाने भावुक आहेत. मात्र, ते खूप शांत मनाने विचार करत नाहीत. त्यांच्या संपर्कात येणारी कोणतीही गोष्ट जर त्यांना स्पष्टपणे प्रामाणिक आणि खरी वाटली, तर ती त्यांना लगेच आकर्षित करते. कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वाखाली झालेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर भागवत यांचे हे विधान आले आहे.
आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी 'एलजीबीटीक्यू प्लस' समुदायाबद्दलही सविस्तर भाष्य केले. हा समुदाय भारतीय समाजाचाच एक भाग असून त्यांना समाजापासून वेगळे किंवा बहिष्कृत केले जाऊ नये, असे मत मांडून ते म्हणाले, 'एलजीबीटीक्यू प्लस' आणि यासारखे समुदाय आपल्या समाजात अस्तित्वात आहेत. अशा प्रवृत्ती मानवी समाजात नेहमीच राहिल्या आहेत. यातील काही गोष्टी नैसर्गिक असतात, ज्या जन्मजात असतात. त्यात आपण किंवा ते स्वतः काहीही करू शकत नाहीत.
तर, काही प्रवृत्ती नंतरच्या मानसिकतेतून किंवा शारीरिक ओढ्यातून निर्माण होतात. जगामध्ये ही संकल्पना अस्तित्वात आहे तर ती आपल्याकडे नव्हती, असे आपण म्हणू शकत नाही. आपणही शेवटी माणसेच आहोत.
भारतीय परंपरेने नेहमीच या घटकांच्या अस्तित्वाला मान्यता दिली आहे, असे सांगत भागवत पुढे म्हणाले की, हे सर्व शेवटी माणूसच आहेत आणि त्यांना जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्या सामाजिक जीवनाच्या विशाल पटलावर त्यांच्यासाठीही स्थान आहे. त्यांच्याकडे हीन भावनेने पाहू नये, हेच आपली संस्कृती शिकवते.