पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे माजी खासदार, चित्रपट निर्माते प्रितीश नंदी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. बिहार राज्यातील भागलपूर येथे एका बंगाली कुटुंबात प्रीतीश नंदी यांचा जन्म झाला होता.
प्रीतीश नंदी यांनी पत्रकारितेत मोठे नाव कमावले होते. तसेच ते नामवंत लेखक होते. टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे प्रकाशन संचालक आणि 1980 च्या दशकात इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया, द इंडिपेंडंट आणि फिल्मफेअरचे संपादक पदही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या कवितांची इंग्रजी भाषेतील चाळीसहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. बंगाली, उर्दू आणि पंजाबी भाषेतील इतर लेखकांच्या कविता तसेच उपनिषदच्या नवीन आवृत्तीचे भाषांतरही त्यांनी केले आहे.
प्रितिश नंदी यांनी २००० च्या दशकाच्या सुरुवातीस सूर, कांटे, झंकार बीट्स, चमेली, हजारों ख्वाईशे ऐसी, प्यार के साईड इफेक्ट्स यांसारख्या लोकप्रिय चित्रपटांसह ४० हून अधिक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांच्या प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स या कंपनीने अलीकडेच फोर मोअर शॉट्स प्लीज आणि मॉडर्न लव्ह मुंबई या काव्यसंग्रह मालिकेची निर्मितीही केली.
बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांनी प्रीतीश नंदी यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट टाकत प्रितीश नंदी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे, ''माझ्या सर्वात प्रिय आणि जवळच्या मित्रांपैकी एक असलेल्या प्रितिश नंदी यांच्या निधनाबद्दल मला अतिव दुःख होत आहे आणि हे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला आहे. एक अद्भूत कवी, लेखक, चित्रपट निर्माते आणि एक धाडसी आणि अद्वितीय संपादक आणि पत्रकार आपण गमावला आहे. माझ्या मुंबईतील सुरुवातीच्या उमेदीच्या काळात माझे प्रेरणास्रोत होते. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर केल्या आहेत.''