![नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA) अंतर्गत आज निर्वासितांना नागरिकत्व प्रमाणपत्रांचे सुपूर्द करताना केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला.](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2F%E0%A5%AB%E0%A5%A6.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) अंतर्गत बुधवारी १४ जणांना नागरिकत्व बहाल करण्यात आले. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या पहिल्या संचा अंतर्गत, केंद्र सरकारने १४ लोकांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्रे प्रदान केली आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांनी नवी दिल्लीत पहिल्या १४ लोकांना सीएए अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली.
नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) अंतर्गत नागरिकत्व प्रमाणपत्रांचा पहिला संच बुधवारी जारी करण्यात आला. केंद्र सरकारकडून १४ जणांना नागरिकत्व प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. नागरिकत्व प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांनी नियुक्त पोर्टलद्वारे १४ लोकांच्या अर्जांवर ऑनलाइन प्रक्रिया केल्यानंतर त्यांना भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्रे सुपूर्द केली आहेत.
दरम्यान, बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील छळ झालेल्या गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय नागरिकत्व देण्यासाठी डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा करण्यात आला होता. यामध्ये हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन धर्मियांचा समावेश आहे. कायदा झाल्यानंतर त्याला राष्ट्रपतींची संमती मिळाली होती. परंतु ज्या नियमांनुसार भारतीय नागरिकत्व दिले जाणार आहे, ते नियम चार वर्षांपेक्षा जास्त विलंबानंतर या वर्षी ११ मार्च २०२४ रोजी जारी करण्यात आले. त्यानंतर आता बुधवारी (१५ मे) १४ जणांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
नागरिकत्व (सुधारणा) विधेयक २०१९ मध्ये संसदेने मंजूर केले. नंतर या विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली. नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) ११ मार्च २०२४ रोजी देशात लागू झाला. या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन समुदायातील अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्व मिळणे सोपे होणार आहे.
हेही वाचा :