

viral Instagram Success Story
नवी दिल्ली: कॉर्पोरेट क्षेत्रातील नोकरी सोडून एका महिलेने स्वतःचा ऑटो रिक्षा व्यवसाय सुरू केला. आज ती महिन्याला सुमारे ६० हजार रुपये कमावते. मात्र, तिच्या मते खरा आनंद पैशांपेक्षा मानसिक शांतता आणि समाधानाचा आहे. तिची ही प्रेरणादायी गोष्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
उद्योजिका नेझरीन मिध्लाज यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमुळे या महिला ऑटोचालकाची कथा चर्चेत आली आहे. ऑटो प्रवासादरम्यान त्यांची या महिलेशी भेट झाली. तिचा आत्मविश्वास, नीटनेटका वावर आणि आयुष्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून त्या प्रभावित झाल्या. नेझरीन यांनी पोस्टमध्ये लिहिले की, "कधी कधी सर्वात प्रभावी कथा अगदी अनपेक्षित संभाषणांतून समोर येतात." त्यांनी सांगितले की, पुरुषप्रधान मानल्या जाणाऱ्या व्यवसायात काम करण्याचा अनुभव विचारल्यानंतर या महिलेने दिलेले उत्तर त्यांच्या मनात घर करून गेले.
संवादादरम्यान या महिला चालकाने तिच्या भूतकाळाबद्दल सांगितले. ती जवळपास नऊ वर्षे एका आयटी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होती. मात्र सततचा ताण, कामाचा दबाव आणि मानसिक तणाव यामुळे तिने ती नोकरी सोडण्याचा धाडसी निर्णय घेतला. नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर तिने स्वतःचा ऑटो रिक्षा घेतला आणि आज ती स्वतःच तो चालवते. या व्यवसायातून तिला दरमहा सुमारे 60 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. मात्र तिच्या मते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती आता आनंदी आणि समाधानी आहे.
या भेटीनंतर नेझरीन मिध्लाज यांनी समाजातील यशाच्या पारंपरिक संकल्पनांवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, अनेकदा लोक प्रतिष्ठित पदे, मोठ्या नोकऱ्या आणि आकर्षक पदव्या मिळवण्याच्या मागे धावत असतात; पण त्या गोष्टी खरोखर आनंद देतात का, हा प्रश्न स्वतःला विचारत नाहीत.
त्यांच्या मते, प्रत्येक यशोगाथा सारखी दिसत नाही. काही वेळा प्रतिष्ठेपेक्षा मानसिक शांततेची निवड करणे हेच सर्वात धाडसी पाऊल असते. दरम्यान, या महिलेच्या निर्णयाचे अनेकांनी कौतुक करत मानसिक समाधानाला प्राधान्य देण्याच्या भूमिकेचे समर्थन केले.
एका वापरकर्त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, "आपण जे करतो त्यातून आनंद मिळणे महत्त्वाचे आहे. लोक काय म्हणतात, याचा फार विचार करण्याची गरज नाही." दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, "तिला साधे आणि आनंदी आयुष्य हवे होते. तिच्या निर्णयासाठी शुभेच्छा. शेवटी प्रत्येकाला शांतता आणि समाधानच हवे असते." तर आणखी एका वापरकर्त्याने उत्तर प्रदेशातील अशाच एका व्यक्तीचा उल्लेख करत सांगितले की, "१५ वर्षांपूर्वी एका व्यक्तीने नोकरी सोडून ऑटो चालवण्यास सुरुवात केली होती. नंतर त्याने व्यवसाय वाढवत पाच ट्रक खरेदी केले. एका मुलाखतीत त्याने आपल्या खात्यात पाच कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे, एवढी प्रगती करूनही तो आजही ऑटो चालवतो."