

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात गुरुवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ५.० तीव्रता नोंदवली गेली. गुवाहाटी आणि राज्याच्या इतर भागातही त्याचे धक्के जाणवले.
आसामचा परिसर भारतातील सर्वात जास्त भूकंपग्रस्त भागांपैकी एक आहे. हे भूकंपप्रवण क्षेत्र V मध्ये स्थित आहे, म्हणजेच येथे तीव्र भूकंपाचा धोका जास्त असतो. आसाममधील मोरीगावमध्ये गुरूवारी पहाटे २:२५ वाजता भूकंप झाला. गेल्या काही वर्षांत या भागात अनेक मोठे भूकंप झाले आहेत. १९५० चा आसाम-तिबेट भूकंप (८.६ तीव्रता) आणि १८९७ चा शिलाँग भूकंप (८.१ तीव्रता) हे इतिहासातील सर्वात शक्तिशाली भूकंपांपैकी एक आहेत.
२५ फेब्रुवारी रोजी बंगालच्या उपसागरात ५.१ तीव्रतेचा भूकंप झाला. त्याचे धक्के कोलकाता आणि पश्चिम बंगालच्या इतर भागातही जाणवले होते.