हरियाणाने प्रतिदिन १०० दशलक्ष गॅलन (MGD) पाणी न सोडल्यामुळे दिल्लीत जलसंकट (Delhi water crisis) निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणा सरकारच्या विरोधात दिल्लीच्या जलमंत्री आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरु आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मंगळवारी पहाटे आतिशी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना लोकनायक जय प्रकाश (एलएनजेपी) रुग्णालयात नेण्यात आले.
हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी रोखल्याचा आपचा आरोप.
दिल्लीत वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला.
दिल्लीतील लोक सध्या टँकरमधून पुरवठा होणाऱ्या पाण्यावर अवलंबून.
पाणी टंचाईमुळे २८ लाख लोकांची गैरसोय.
हरियाणाने दिल्लीच्या वाट्याचे पाणी सोडावे या मागणीसाठी आतिशी यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवारी त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. एलएनजेपी रुग्णालयातील डॉक्टरांनी आतिशी यांच्या प्रकृतीची तपासणी केली. त्यांच्या बेमुदत उपोषणामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत डॉक्टरांनी त्यांना कालच रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, आतिशी यांनी मात्र त्यांचे बेमुदत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
"माझा रक्तदाब आणि शरिरातील साखरेची पातळी कमी होत आहे. माझे वजन कमी झाले आहे. केटोनची पातळी खूप जास्त आहे, ज्यामुळे दीर्घकाळ हानिकारक परिणाम होऊ शकतात," असे आतिशी यांनी म्हटले आहे. "मला कितीही त्रास होत असला तरी, हरियाणा जोपर्यंत पाणी सोडत नाही तोपर्यंत मी उपोषण सुरूच ठेवणार आहे," असे सांगून त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला.
दरम्यान आपने (AAP) ने दावा केला आहे की अतिशी यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण मध्यरात्री ४३ पर्यंत खाली आले आणि पहाटे ३ पर्यंत ते ३६ पर्यंत खाली आले. आपने आतिशी यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेत असलेले फोटो शेअर केले आहेत. "आतिशी यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण ३६ पर्यंत खाली आले आहे. त्यामुळे त्यांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे," अशी माहिती आप नेते आणि दिल्लीचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी X वर पोस्ट करत दिली आहे.
अतिशी यांच्या तब्येतीबद्दल एलएनजेपी रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश यांनी अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले, "त्यांच्या ईसीजीमध्ये बदल आढळून आला आहे. यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना कालच रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्यांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला होता. त्यांच्या शरिरातील साखरेची पातळी खाली आली आहे. सर्व रक्त चाचण्या करण्यात आल्या आहेत आणि त्या सामान्य आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे."
दिल्ली तीव्र पाणी टंचाई आहे. असे असताना हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर प्रतिदिन १०० दशलक्ष गॅलन (MGD) पाणी सोडत नसल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे. दिल्लीतील पाणी टंचाईमुळे २८ लाख लोकांची गैरसोय होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. "दिल्लीला पाणी पुरवठा शेजारील राज्यांमधून होतो. हरियाणा सरकारने दिल्लीच्या वाट्याचा १०० दशलक्ष गॅलन किंवा ४६ कोटी लिटरपेक्षा जास्त पाणी पुरवठा थांबवला आहे," असे आतिशी यांनी म्हटले आहे. सध्या सुरू असलेल्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या कॅबिनेटमंत्र्यांनी जंगपुरा येथील उपोषणस्थळी बैठक घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जलसंकटावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत वाढते तापमान आणि उष्णतेच्या लाटेमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिल्लीतील लोक सध्या टँकरमधून पुरवठा होणाऱ्या पाण्यावर अवलंबून आहेत.