तामिळनाडू येथील कल्लाकुरिची जिल्ह्यात विषारी दारू प्रकरणातील मृतांचा आकडा ६१ वर गेला आहे. अद्यापही ११८ बाधितांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. १८ जून रोजी कल्लाकुरिची जिल्ह्यात करुणापूरम येथे घडलेल्या प्रकाराने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) याची स्वतःहून दखल घेतली आहे. या घटनेचा तपशीलवार अहवाल सादर करावा, अशी नोटीस तमिळनाडूचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेसादर केल्या आहेत.
तामिळनाडूतील विषारी दारु प्रकरणात सहा महिलांचाही मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) याची स्वत:हून दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे. दरम्यान, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी द्रमुक आणि विरोधी पक्षातील एआयएडीएमके यांच्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.