![Amit Shah rejected the allegations of BJP leaders against Shinde](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2F10-2-15.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या दारुण पराभवास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कारभारही जबाबदार असल्याची तक्रार राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. मात्र भाजप नेत्यांच्या या तक्रारी व आरोपांना मात्र शहा यांनी भीक घातली नसून उलट त्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांचे कान टोचले आहेत.
भाजप नेत्यांनी शहा यांचे आपल्याविरोधात कान फुंकण्याचे प्रयत्न केल्याची कुणकुण लागताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्ली गाठत आपली बाजू प्रभावीपणे मांडल्याचेही वृत्त आहे. शहांच्या कानपिचक्या आणि त्यांच्यातर्फे शिंदे यांची होत असलेली पाठराखण यामुळे राज्यातील भाजप नेते अस्वस्थ आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांचा कारभार केवळ आपल्या गटापुरता मर्यादित राहिला, असा आरोप प्रदेश भाजपमधील नेत्यांनी अमित शहा यांच्या बैठकीत केला. महाराष्ट्रात भाजपने महायुतीचा 45 पारचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात केवळ 9 जागा भाजप जिंकू शकली. याची गंभीर दखल भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे. गेल्या आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत बावनकुळे, पंकजा मुंडे आदी नेत्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली.
मराठा/ ओबीसी आरक्षण आंदोलने, जागावाटपाचा घोळ, राज्य सरकारचा कारभार आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यातील भाजपच्या नेत्यांना आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्या गटाच्या आमदारांपुरता मर्यादित कारभार या पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे खापर राज्यातील नेत्यांनी फोडले. जरांगे प्रकरण शिंदे यांना नीट हाताळता आले नाही. भाजपच्या आमदारांची कामे झाली नाहीत, असे अनेक आरोप या बैठकीत करण्यात आले. शिंदे यांच्याकडे शिवसेनेची मते वळली नाहीत, त्याचा फायदा झाला नाही, असे भाजपचे नेते म्हणाले.
तेव्हा, त्यांचा वेगळा गट आहे. त्यांनी त्यांच्या काही जागा राखल्या. भाजपच्या जुन्या नेत्यांना भाजपच्या नेत्यांनी सोबत घेतले नाही. जुन्या आणि नव्याना सोबत घेऊन काम केले नाही, तुम्हाला हवे असलेले उमेदवार दिले तरी निकाल विरोधात गेला. यास ज्यांच्याकडे नेतृत्व होते त्यांना जबाबदार धरले पाहिजे, यापुढे 2014 पूर्वी ज्या प्रमाणे राज्यात सामूहिक नेतृत्व निर्णय घेत होते तीच पद्धत यापुढे राबविण्यात यावी, असे आदेश अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांना दिले.
भाजपच्या दिल्लीतील बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेवून अहवाल सादर केला. राज्यातील भाजप नेत्यांनी केलेले आरोप त्यांनी खोडून काढले. उद्धव ठाकरे गटापेक्षा आपल्या पक्षाला जास्त मते पडली आहेत. जागावाटपात गोंधळ झाला नसता तर आणखी जागा आम्ही जिंकलो असतो. जागावाटपाच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्व्हे रिपोर्ट दाखवून आमच्या जागांवर दावा केला. यात अनेक जागेवर गोंधळ झाला. त्यामुळे विधानसभेसाठी आमच्या पक्षाला जास्त जागा दिल्या तर विधानसभा निवडणुक जिंकता येईल, असे शिंदे यांनी शहा यांना सांगितल्याचे समजते.