![तामिळनाडूत विषारी दारू पिल्याने ३४ जणांचा मृत्यू](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2FUntitled-design-T-.-1-236.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : तामिळनाडू येथील कल्लाकुरीची या ठिकाणी विषारी दारू पिऊन ३४ जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांसह काही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलिसप्रमुखांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
बेकायदा मद्य विक्रेत्याकडून गावातील काही लोकांनी मद्याच्या बाटल्या खरेदी केल्या. विषारी दारू सेवनामुळे मृतांची संख्या ३४ वर पोहोचली आहे, तर १०० हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे कल्लाकुरिचीचे जिल्हाधिकारी एमएस प्रशांत यांनी सांगितले. बेकायदा मद्य विक्रेत्यास पोलिसांनी अटक केली आहे. घटास्थळावरून २०० लिटरचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, विरोधकांनी या प्रकरणावरून स्टॅलिन सरकारला धारेवर धरले आहे. निष्पाप लोकांच्या मृत्यूप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपये आणि उपचार घेत असलेल्या लोकांना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे. माजी न्यायमूर्ती बी गोकुळदास यांचा समावेश असलेल्या एक सदस्यीय आयोगाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी ३ महिन्यांत अहवाल सादर करण्याची घोषणा केली आहे.
हेही वाचा :