![Congress](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F06%2FCongress-Logo.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ६ जागांवर प्रकाश आंबेडकर यांच्या 'वंचित'मुळेच महाविकास आघाडीचा पराभव झाल्याचा निष्कर्ष काँग्रेसने काढला आहे. वंचित सोबत नसल्याने भाजपला त्याचा फायदा होऊन महायुतीला १७ जागा मिळाल्या, असा दावा काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मिडीयावरील 'एक्स'वर केलेल्या पोस्टमधून केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित, मायावती यांच्या बसपा आणि ओवेसींच्या एमआयएममुळे भाजपला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात फायदा झाला. राज्यातील अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, वायव्य मुंबई, पालघर आणि हातकणंगले या मतदारसंघात वंचित व एमआयएम पक्षामुळेच मविआच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्यामध्ये ५ जागांवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आणि एका जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाल्याचे श्रीनेत यांनी म्हटले आहे.