

Congress Accuses JDU BJP on Girl Assault Case
नवी दिल्ली: बिहारमध्ये नऊ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार आणि योग्य उपचारांअभावी तिचा झालेला मृत्यू यासाठी जदयू-भाजप सरकार जबाबदार आहे, डबल इंजिन सरकारमध्ये सतत घृणास्पद गुन्हे घडत आहेत आणि सरकार कानात तेल घालून झोपले आहे, असा आरोप काँग्रेसने केला. बिहार सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. बिहारमध्ये दररोज ८ खून, ३३ अपहरण आणि १३४ हून अधिक घृणास्पद गुन्हे घडत आहेत, असा दावाही काँग्रेसने केला.
राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात काँग्रेस नेत्या खा. रंजित रंजन आणि काँग्रेस प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रंजित रंजन म्हणाल्या की, राज्यातील महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित होतो. २६ मे रोजी मुझफ्फरपूरच्या कुधनी ब्लॉकमध्ये एका ९ वर्षांच्या दलित मुलीवर बलात्कार करून तिचा गळा चिरून तिला विटांच्या भट्टीत टाकण्यात आले. तिच्या शरीरावर २० चाकूच्या जखमा होत्या. या घटनेनंतर प्रशासनाचा गंभीर निष्काळजीपणाचा आणि असंवेदनशीलता कळस गाठला. जेव्हा लोक तक्रार नोंदवण्यासाठी गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावरच लाठीमार केला. ९ वर्षाच्या चिमुकलीसबत क्रूर कृत्य करणारा आरोपी गुन्हागारी पार्श्वभुमीचा होता तर तो बाहेर कसा फिरत होता, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
रंजित रंजन म्हणाल्या की, म्हणाले बिहार महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसह इतर काँग्रेस नेते पीडितेला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले होते. मुलीची गंभीर प्रकृती पाहून काँग्रेस पक्षाने तिला दिल्ली एम्समध्ये विमानाने नेण्याची विनंती केली मात्र सरकारने याला मान्यता दिली नाही. शनिवारी मुलीची प्रकृती बिघडल्यानंतर जेव्हा तिला पटना येथे आणण्यात आले तेव्हा एम्स पटना येथे तज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे सांगत तिच्यावर उपचार करण्यास नकार दिला. यानंतर, मुलीला पाटण्यातच दुसरीकडे हलवण्यात आले. तिथे ती ५ तास रुग्णवाहिकेतच राहिली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर, मुलीला एका मोठ्या रुग्णालयात बाल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत तिची प्रकृती खूपच गंभीर झाली होती. आणि उपचारादरम्यान मुलीचा दुर्देवी मृत्यू झाला. यावेळी रंजित रंजन यांनी अलिकडच्या काळात बिहारमधील मुझफ्फरपूर, छपरा, सीतामढी, बेतिया, मुंगेर आणि अररिया येथे झालेल्या बलात्काराच्या इतर घटनांचाही उल्लेख करत बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजप सरकारवर हल्ला चढवला.
पत्रकार परिषदेत डॉ. शमा मोहम्मद यांनी भाजप नेत्यांवर बलात्काराचे आरोप होत असल्याचा आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला. त्या म्हणाल्या की, नवीन संसद भवनाचे उद्घाटन होत असताना ब्रिजभूषण शरण सिंह आत उपस्थित होते आणि पोलिस देशाच्या महिला कुस्तीपटूंना मारहाण करत होते. बिल्किस बानोच्या बलात्काऱ्यांना भाजप नेत्यांनी पुष्पहार अर्पण केला. भाजपच्या राजवटीत मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार झाले, मात्र अनेक प्रकरणांमध्ये साधी तक्रारही नोंदवली गेली नाही, असेही त्या म्हणाल्या.
शनिवारी भाजप प्रवक्ते प्रेम शुक्ला यांनी काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांच्या दिवंगत आईबद्द एका वाहिनीवरील चर्चेत अश्लील टिप्पणी केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी का मौन बाळगून आहेत, असे म्हणत प्रश्न उपस्थित केले आणि सरकारच अशा आरोपींना संरक्षण देण्याचे काम करते, असेही डॉ. शमा मोहम्मद म्हणाल्या.