

china double diplomacy condemns pahalgam attack while reaffirms support for pakistan
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निंदा करून चीनने प्रथम दहशतवादाविरूद्ध कडक भूमिका दर्शविली. मात्र लगेच दुसऱ्या बाजुला पाकिस्तानला आपला 'पोलादी मित्र' म्हणून गौरव करत त्याच्या सार्वभौमत्वाला आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याला आपला पुन्हा पाठिंबा दर्शविला. ही घटना भारत-चीन-पाकिस्तान या देशांमधील चाललेल्या राजनैतिक संघर्षाचा एक नवीन अध्याय बनले आहे, जिथे चीनच्या 'दुहेरी' धोरणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी नुकतीच पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांच्याशी चर्चा केली. या दरम्यान त्यांनी पाकिस्तानचे सार्वभौमत्व, क्षेत्रिय अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या रक्षेसाठी चीनला समर्थन दर्शविले आहे. वांग यी यांनी पाकिस्तानचे वर्णन 'सर्वकाळ चालणारा धोरणात्मक भागीदार' आणि 'पोलादासारखा मित्र' असे केले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, वांग यांनी पाकिस्तानच्या संयम आणि जबाबदार वृत्तीचे कौतुक केले.
तसेच यानंतर वांग यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशीही फोनवरून चर्चा केली आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी म्हटले की, चीन दहशतवादाचा तीव्र विरोध करतो. चीनी परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती क्लिष्ट आणि अस्थिर आहे. आशिया खंडात शांतता राहणे महत्वाचे आहे असे म्हटले आहे.
चीनने असेही म्हटले आहे की भारत आणि पाकिस्तान दोन्ही बाजूंनी संयम बाळगावा, संवाद आणि सल्लामसलतीद्वारे परस्पर मतभेद सोडवावेत आणि लष्करी संघर्ष वाढू नये अशी त्यांची इच्छा आहे. बीजिंगने आशा व्यक्त केली की, दोन्ही देश एका व्यापक आणि कायमस्वरूपी युद्धबंदीकडे वाटचाल करतील, जी केवळ दोन्ही देशांनाच नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय समुदायाला हवी आहे.
तज्ज्ञांचे मत आहे की, चीनचे हे धोरण दुटप्पी आहे, जिथे एकीकडे ते दहशतवादाचा निषेध करते, तर दुसरीकडे ते पाकिस्तानच्या समर्थनार्थ उभे राहताना दिसते, जे अनेक वेळा दहशतवादी कारवायांचे केंद्र राहिले आहे. दोन तोंडी असलेल्या रोमन देव जानूसप्रमाणे, चीन देखील दोन तोंडे घेवून जगासमोर उभा आहे.
युद्धबंदीच्या घोषणेनंतर, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी चीनचे आभार मानले आणि म्हटले की, मी गेल्या ५८ वर्षांपासून पाकिस्तानसोबत उभे राहिलेल्या चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे आणि चीनच्या जनतेचे मनापासून आभार मानू इच्छितो.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवसांपासून सुरू असलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतर युद्धबंदीची घोषणा करण्यात आली, ज्यामुळे दोन्ही अण्वस्त्रधारी राष्ट्रे युद्धाच्या उंबरठ्यावर आली. शनिवारी, भारत आणि पाकिस्तानने जल, जमीन आणि हवाई मार्गाने होणाऱ्या सर्व लष्करी कारवाया तात्काळ थांबवण्यास सहमती दर्शविली.