Chandrababu Naidu : अमरावती हीच आंध्र प्रदेशची एकमेव राजधानी! चंद्राबाबू नायडू यांची मोठी घोषणा

चंद्राबाबू नायडू ( संग्रहित छायाचित्र)
चंद्राबाबू नायडू ( संग्रहित छायाचित्र)

पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याच्या एक दिवस आधी, तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी मंगळवारी जाहीर केले की अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल. टीडीपी, भाजप आणि जनसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला नायडू संबोधित करत होते. बैठकीत त्यांची आंध्र प्रदेश विधानसभेतील एनडीए नेते म्हणून एकमताने निवड करण्यात आली.

आंध्र प्रदेशपासून वेगळे राज्य म्हणून तेलंगणाची निर्मिती झाल्यानंतर येथील राजधानीबाबत वाद निर्माण झाला. आधी आंध्र प्रदेशच्या तीन राजधान्यांचा उल्लेख होता, आता तेलुगु देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू यांनी एकच राजधानी ठेवण्याची घोषणा केली आहे. आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना बहुमत मिळाले आहे. ते बुधवारी (12 जून) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. शपथविधी समारंभाच्या एक दिवस अगोदर, त्यांनी मंगळवारी जाहीर केले की अमरावती ही राज्याची एकमेव राजधानी असेल.

विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घोषणा

टीडीपी, भारतीय जनता पक्ष आणि जनसेनेच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करताना नायडू म्हणाले की, 'आमच्या सरकारमध्ये तीन राजधान्यांच्या नावाखाली खेळ होणार नाही. आमची राजधानी अमरावतीच आहे.

सरकार बदलल्याने धक्का

खरेतर, 2014-2019 या वर्षात विभाजित आंध्र प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री म्हणून नायडू यांनी अमरावतीला राजधानी करण्याचा विचार मांडला होता. पण 2019 मध्ये TDP सत्तेतून बाहेर पडल्याने त्यांच्या कल्पनेला धक्का बसला. त्यावेळी वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील YSRCP ने मोठा विजय मिळवला. रेड्डी यांनी अमरावतीला राजधानी बनवण्याची योजना सोडून दिली आणि तीन राजधान्यांची नवी योजना मांडली. मात्र, आता नायडू (Chandrababu Naidu) पुन्हा सत्तेत आले असून त्यांनी आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीच असेल असे स्पष्ट केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत उत्कृष्ट कामगिरी

राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये टीडीपी, भाजप आणि जनसेना यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) दणदणीत विजय मिळवला. येथे विधानसभा निवडणुकीत एनडीएने 164 जागा जिंकल्या तर लोकसभा निवडणुकीत आंध्र प्रदेशात 21 जागा जिंकल्या. विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीतील या विजयाचा परिणाम केंद्र सरकारवरही झाल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारमध्ये टीडीपीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या विजयाने अमरावती राजधानी प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news