

Bhabanipur election petition : माझे मोठे भाऊ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत, यावर मी पूर्ण खुलाशानंतरच यावर सुनावणी घेईन, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येऊ नये," असे स्पष्ट करत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौरांग कांत यांनी ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणूक निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली. बॅनर्जी यांनी या याचिकेद्वारे भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून अधिकारी यांच्या अलीकडील निवडीला आव्हान दिले आहे. न्यायालयाने या प्रकरणी मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्याकडून उत्तर मागवले आहे.
बार अँड बेंचने दिलेल्या वृत्तानुसार, विधानसभा निवडणुकीत अधिकारी यांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांचा (ममता बॅनर्जी) पराभव केला होता. अधिकारी यांना ७३,९१७ मते मिळाली होती – जी बॅनर्जी यांच्यापेक्षा १५,१०५ जास्त होती. बॅनर्जी यांना केवळ ५८,८१२ मते मिळवता आली होती.
आजच्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती गौरांग कांत यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका लोकप्रतिनिधी कायद्याच्या (RP Act) तरतुदींच्या आवश्यकतांचे सकृतदर्शनी (prima facie) पालन करते, याबद्दल न्यायालयाचे समाधान झाले आहे. त्यामुळे, या टप्प्यावर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८६(१) अंतर्गत याचिका फेटाळण्यासाठी कोणतेही कारण अस्तित्वात नाही, असे न्यायालयाने म्हटले.
न्यायालयाने आदेश दिला की, "प्रतिवादींच्या वकिलांनी चार आठवड्यांच्या आत आपले उत्तर (प्रतिज्ञापत्र) दाखल करावे. त्यानंतरच्या चार आठवड्यांत त्यावर प्रत्युत्तर दाखल केले जावे." यासोबतच न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी बारा आठवड्यांनंतर निश्चित केली आहे.
याशिवाय, न्यायालयाने मतमोजणी केंद्रातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (EVMs) तसेच भवानीपूरमधील सर्व मतदान केंद्रांवर वापरण्यात आलेल्या व्हीव्हीपॅट (VVPAT) मशिन्स सुरक्षित ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
विशेष म्हणजे, या प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यापूर्वी न्यायमूर्ती कांत यांनी स्पष्ट केले की, त्यांचे भाऊ भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. न्यायमूर्ती कांत म्हणाले, "माझे मोठे भाऊ भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. या याचिकेच्या संदर्भात त्याबाबत काही चिंता असू शकते. म्हणूनच मी पूर्ण खुलाशानंतरच यावर सुनावणी घेईन, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणतीही अडचण येऊ नये."
ममता बॅनर्जींचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कल्याण बंडोपाध्याय यांनी न्यायमूर्ती कांत यांच्या सुनावणीला कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितले आणि न्यायमूर्तींवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे स्पष्ट केले. यानंतर ज्येष्ठ वकिलांनी गुणवत्तेच्या आधारे युक्तिवाद केला.बंडोपाध्याय म्हणाले की, मतमोजणीदरम्यान गंभीर गैरप्रकार झाले आहेत. हितसंबंधांचा संघर्ष असतानाही भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याची (RO) नियुक्ती करण्यात आली होती आणि आता त्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात करण्यात आली आहे. दुसरे कारण म्हणजे पक्षपातीपणा. हे निवडणूक निर्णय अधिकारी २०२१ च्या नंदीग्राम निवडणुकीतही होते. त्या वेळीही माझ्या अशिलाचा (ममता बॅनर्जी) पराभव झाला होता. या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याविरुद्ध अनेक तक्रारी आहेत," असे बंडोपाध्याय म्हणाले.