दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हिंदूवरील वक्तव्याविरोधात दिल्ली भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनी बुधवारी जोरदार आंदोलन केले. आक्रमक झालेले आंदोलक जैसलमेर हाऊसपासून अकरबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयाकडे निघाले असता, दिल्ली पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी आंदोलकांनी राहुल गांधी विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच राहुल गांधींनी हिंदू समाजाची माफी मागण्याची मागणीही आंदोलकांनी केली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते या नात्याने आपल्या पहिल्या भाषणात राहुल गांधींनी भाजपवर हिंसाचाराचा आणि द्वेष पसरवल्याचा आरोप करत, पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही हल्लाबोल केला होता. त्याच्या निषेधार्थ दिल्ली भाजपने हे आंदोलन केले. जर हिंदू हिंसक झाले असते. तर काशी, मथुरेचा प्रश्न सुटला असता, भगवान श्रीराम यांना तंबूत राहावे लागले नसते आणि त्यांच्या मंदिरासाठी ५०० वर्षे वाट पाहावी लागली नसती. असा हल्लाबोल यावेळी दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष विरेंद्र सचदेवा यांनी केला.
या आंदोलनामध्ये दिल्ली भाजप प्रदेशाध्यक्षांसह भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या, दिल्लीतील खासदार मनोज तिवारी, खासदार बासुरी स्वराज आदी उपस्थित होते. तसेच मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.