पुढारी ऑनलाईन डेस्क: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प आज (दि.२२ जुलै) संसदेत मांडण्यात आला. अर्थमंत्री निर्मला सीतामारामन यांनी मोदी सरकार काळातील आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (दि.२३) सादर केलेल्या अर्थसंकल्पात समाजातील प्रत्येक घटकाचा विचार केला आहे. तरुणांना संधी देणारे आजचे बजेट आहे. देशाला समृध्दीकडे नेणारे बजेट आहे. तसेच मध्यमवर्गाला ताकद देणारे बजेट आहे. एक कोटी तरुणांना इंटरशीप मिळणार आहे. सर्व देशाला न्याय देण्याचा प्रयत्न आजच्या अर्थसंकल्पातून केला आहे. मुद्रा योजनेतील निधीत १० लाखांवरून २० लाखापर्यंत वाढ करण्यात आली आहे. या लोनचा छोट्या व्यावसायिकांना फायदा मिळणार आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे.
मोदी म्हणाले की, या अर्थसंकल्पात सरकारने 'एम्प्लॉयमेंट लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम' जाहीर केली आहे. यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होण्यास मदत होईल. या योजनेंतर्गत, सरकार नवीन येणाऱ्यांना पहिला पगार देईल. खेड्यापाड्यातील तरुणांना प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम करता येणार आहे.