

नवी दिल्ली : अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होईल, असे मला वाटत नाही, असे माजी खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे. ते व्हावे यासाठी मोठे आंदोलन केले. मात्र परवानग्यांचे दाखले देत पुढे काहीच होत नाही, असे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्रातील किल्ले संवर्धनासाठी ज्या प्रमाणात मदत अपेक्षित आहे, त्या प्रमाणात सरकारची मदत होत नाही, असेही ते म्हणाले.
रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून दुर्गराज रायगडाचे संवर्धन आणि विकासकामे सुरू आहेत. या कामांमध्ये सरकारची मदत होत आहे, मात्र ज्या प्रमाणात मदत अपेक्षित आहे तशी होत नाही. 12 किल्ले जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर करण्यात आले. त्यापैकी केवळ रायगड किल्ल्यावर काम सुरू आहे.
जलदुर्गांसह इतरही किल्ल्यांचे संवर्धन होणे आवश्यक आहे, असे छत्रपती संभाजीराजे यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमासाठी संभाजीराजे दिल्लीत होते. यादरम्यान ते म्हणाले की, राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचे सरकार आहे. तरीही परवानग्या मिळत नाहीत, ही सबब दिली जाते. त्यामुळे सरकारने हे स्मारक होणार की नाही याबद्दल एकदाच काय ते स्पष्टपणे सांगावे.