

नवी दिल्ली : १० नोव्हेंबर २०२५ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील भीषण कार बाॅम्ब स्फोटामागे ‘अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट’ (एक्यूआयएस) या दहशतवादी संघटनेचा हात होता, असा खळबळजनक दावा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) ३८ व्या अहवालात केला गेला आहे. या स्फोटात ११ निष्पाप नागरिकांचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते.
‘यूएनएससी’च्या विश्लेषणात्मक आणि निर्बंध देखरेख पथकाने सोमवारी हा अहवाल प्रसिद्ध केला. यापूर्वीच्या ३७ व्या अहवालात एका सदस्य देशाने या हल्ल्यामागे ‘जैश-ए-मोहम्मद’चा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या आरोपपत्रातही ‘एक्यूआयएस’चाच संबंध स्पष्ट करण्यात आला होता.
अहवालानुसार, ‘एक्यूआयएस’ ही संघटना आता केवळ एका ठरावीक भागापुरती मर्यादित न राहता एक प्रादेशिक दहशतवादी नेटवर्क म्हणून विकसित झाली आहे. ही संघटना आता मोठ्या गटांऐवजी लहान आणि स्वतंत्र ‘सेल’द्वारे काम करत आहे. त्यांनी स्वतःची रसद (लॉजिस्टिक्स) आणि आर्थिक यंत्रणाही उभारली आहे. ‘एक्यूआयएस’ आता बांगला देशातही आपले स्फोटक जाळे तयार करण्याचा प्रयत्न करत असून, ही बाब दक्षिण आशियाच्या सुरक्षेसाठी अत्यंत चिंतेची असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.