पुढारी ऑनलाईन डेस्क : आंध्र प्रदेशमध्ये अनकापल्ले जिल्ह्यातील अच्युतापुरम सेझमधील एका औषध कारखान्यात बुधवारी झालेल्या स्फोटात आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला, तर ४० जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या वेळी युनिटमध्ये अडकलेल्या १३ जणांना वाचवण्यात यश आल्याचे जिल्हाधिकारी विजया कृष्णन यांनी सांगितले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी अच्युतापुरम फार्मा कंपनी दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आज ते घटनास्थळी भेट देणार आहेत.
बुधवारच्या अपघाताबाबत अनकापल्लेचे जिल्हा दंडाधिकारी विजय कृष्णन म्हणाले, जिल्ह्यातील अच्युतापुरम येथील एसेन्शिया ॲडव्हान्स्ड सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये दुपारी २:१५ वाजता आग लागली. कारखान्यात दोन शिफ्टमध्ये ३८१ कर्मचारी काम करतात. जेवणाच्या वेळी हा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती.