नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निकालाच्या दोन दिवस अगोदर रविवारी इंडिया आघाडी पाठोपाठ (दि.२) भाजपने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली. यावेळी भाजपनेही मतमोजणी संदर्भात निवडणूक आयोगाकडे काही मागण्या केल्या. मतमोजणी प्रक्रिया आणि मतमोजणी वेळी सुरक्षा संबंधीच्या मागण्या केल्याचे यावेळी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी सांगितले.
देशात १९ एप्रिल ते १ जून दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. उद्या (दि.४) लोकसभा निवडणूकीचा निकाल लागणार आहे. त्याअगोदर भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली. भाजपच्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, पियुष गोयल, राम पाठक, संजय मयूख यांचा समावेश होता.
१. मतमोजणी प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी त्या प्रक्रियेच्या अगदी सूक्ष्म गोष्टींशी पूर्णपणे परिचित असावा . तसेच भारतीय निवडणूक आयोगाचे सर्व मतमोजणी प्रोटोकॉल त्याला माहिती असावेत.
२. मतमोजणी आणि निकाल जाहीर करताना सुरक्षितता असावी , हिंसाचार आणि अशांतता टाळण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात.
३. मतमोजणी वेळी व्यत्यय आणणे, दबाव आणणे किंवा त्यासंबंधी प्रयत्न करणाऱ्यावर कडक कारवाई करावी.
४. निवडणूक प्रक्रियेची अखंडता समजावून सांगण्यासाठी सार्वजनिक सूचना जारी करावी, लोकशाही प्रक्रियेला धोका निर्माण करणाऱ्या इशारा द्यावा.