

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षावर (Prashant Kishor vs Rahul Gandhi) शाब्दिक हल्ला चढवला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसमध्ये लोकशाही नाही. पक्ष वाचवायचा असेल, तर लोकशाही पद्धतीने गांधी घराण्याच्या बाहेरच्या नेत्याला अध्यक्षपदी निवडून द्या. देशातील सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसशिवायही भाजपविरोधी आघाडी उभारणे शक्य आहे.
एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल करत, ट्विट आणि कँडल मार्चच्या माध्यमातून तुम्ही भाजपला कधीही पराभूत करू शकत नाही, असे म्हटले आहे. भाजप खूप मजबूत झाला आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा पराभव करण्यासाठी तुम्हाला मजबूत रणनीती बनवावी लागेल.
1984 नंतर काँग्रेसने एकही लोकसभा निवडणूक स्वबळावर जिंकलेली नाही. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसचा ९० टक्के निवडणुकांमध्ये दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस नेतृत्वाने पराभवाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधान मोदी हे सर्व लोकांचे ऐकतात. ही त्याची सर्वात मोठी ताकद आहे. लोकांना कशाची गरज आहे हे त्यांना माहीत आहे. पुढील काही दशके देशाचे राजकारण भाजपभोवती फिरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रशांत किशोर यांनी काँग्रेसवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तत्पूर्वी, त्यांनी एका ट्विटमध्ये लिहिले होते की, काँग्रेस मजबूत विरोधी पक्षासाठी ज्या कल्पना आणि तपशीलाचे प्रतिनिधित्व करते ते महत्त्वाचे आहे, परंतु विरोधी पक्षाचे नेतृत्व हा काँग्रेसचा दैवी अधिकार नाही, जेव्हा पक्षाने गेल्या 10 वर्षात 90 टक्के निवडणुका हारल्या आहेत. विरोधी नेतृत्वाला लोकशाही पद्धतीने निर्णय घेऊ द्या, असा सल्लाही त्यांनी काँग्रेसला दिला.
हेही वाचले का ?