नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत आणि बांगलादेश या देशांनी दहशतवाद आणि नक्षलवादाशी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. भारत दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत याबाबतच्या द्विपक्षीय करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
दहशतवाद व नक्षलवादाशी लढण्यासह बांगलादेशसोबत परस्पर सहकार्य करण्याच्या विषयावर करार झाल्याची माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली. गेल्या वर्षभरात भारताच्या बांगलादेशसोबत दहा बैठकी झाल्या असून ही बैठक अत्यंत महत्वपूर्ण ठरली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर भारत भेटीवर येणाऱ्या शेख हसीना या पहिल्या अतिथी असल्याचे त्यांनी म्हटले.
बांगलादेशसोबत 1320 मैत्रेयी औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून वीज पुरवठा सुरू करण्यासह भारतीय रुपयांमध्ये व्यापार प्रारंभ करण्याच्या मुद्यावरसुद्धा करार करण्यात आला. याशिवाय संरक्षण सामुग्री उत्पादन आणि सशस्त्र दलाचे आधुनिकीकरण याबाबत सहकार्य करण्यावर चर्चा झाल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, भारत हा आमचा प्रमुख शेजारी सहकारी देश आणि विश्वसनीय मित्र आहे. 1971 च्या बांग्लादेश मुक्ति संग्रामात प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या स्मृती जागवून शेख हसीना यांनी त्यांना अभिवादन केले.