नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : नागरी उड्डायण क्षेत्रातील नवनवीन आव्हानांचा अभ्यास करून आपल्याला पुण्यासह महाराष्ट्र आणि देशासाठी चांगले काम करायचे आहे, असा संकल्प केंद्रीय नागरी उड्डायण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज (दि.13) व्यक्त केला. पहिल्यांदाच खासदार आणि थेट केंद्रीय राज्यमंत्री झाल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.
नागरी उड्डायण खात्याचे राज्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेताच मोहोळ यांनी आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. मोहोळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात नागरी उड्डायण क्षेत्रात अतिशय चांगले काम झाले. ही सर्व कामे आणि या क्षेत्रातील आव्हानांचा अभ्यास करून देशाची सेवा करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.
राज्यातील विमान वाहतूक वाढविण्यासाठी पुरंदर आणि नवी मुंबई विमानतळ उभारण्याचे काम वेगाने पूर्ण केले जाईल. पुणे विमानतळाच्या विस्ताराचे कामही झटपट पूर्ण केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्याच्या महापौरपदी असताना पुणे विमानतळाशी संबंधित विषय घेऊन दिल्लीत आलो होतो. त्यावेळी नागरी उड्डायण खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, एक दिवस या खात्याचा राज्यमंत्री म्हणून सूत्रे हाती घेईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते, अशी आठवण मोहोळ यांनी सांगितली.