NEET : नीट परीक्षा निकालातील घोळाची उच्चस्तरीय चौकशी करा, काँग्रेसची मागणी

NEET : नीट परीक्षा निकालातील घोळाची उच्चस्तरीय चौकशी करा, काँग्रेसची मागणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या (नीट) निकालात ६७ उमेदवारांना १०० टक्के गुण मिळाल्याचा घोळ झाल्याने या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी केली आहे. निकालातील घोळासाठी मोदी सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नीट व इतर परीक्षांमधील हुशार विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी या संपूर्ण घोळाची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खर्गे यांनी 'एक्स' वर केलेल्या पोस्टमधून केली आहे.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांनीही 'एक्स'वर पोस्ट करून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. आधी नीट परीक्षेचा पेपर लीक झाला आणि आता निकालातही घोटाळा झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकाच परीक्षा केंद्रातील ६ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाल्याने अनेक गैरप्रकार उघडकीस आल्याने गंभीर प्रश्न निर्णाण झाल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.

काय आहे नीटच्या निकाल गोंधळाचे प्रकरण?

नीट परीक्षेत यंदा २४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यातील १३.१६ टक्के विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. एकूण ६७ विद्यार्थ्यांनी ७२० पैकी ७२० गुण मिळवले आहेत. दरवर्षी एक किंवा दोन मुलांना नीटच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी गुण मिळतात. मात्र, यंदाच्या निकालात अनपेक्षित घडले आहे. त्यामुळे पेपरफुटी आणि परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news