पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील बहुचर्चित लोकसभा मतदारसंघापैकी एक असणार्या अमेठी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांचा काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा यांनी सुमारे १ लाख ४५ हजार मतांनी पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव करणाऱ्या स्मृती इराणी यांना यावेळी 3 लाख 40 हजार 693 मते मिळाली तर किशोरी लाल शर्मा यांना 4 लाख 86 हजार 166 मते मिळाली आहेत.
पराभवानंतर माध्यमांशी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, " मी भाजप पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि समर्थकांचे आभार मानते. आज मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आभारी आहे की त्यांच्या सरकारने 30 वर्षांची प्रलंबित कामे केवळ 5 वर्षात पूर्ण केली आहेत."
अमेठीमध्ये २० मे रोजी मतदान झाले होते.मतदानाची टक्केवारी ५४.३४ टक्के इतकी होती. प्रियांका गांधी यांनी स्वत: येथे किशोरी लाल यांच्यासाठी जोरदार प्रचार केला होता. राहुल आणि अखिलेश यांची संयुक्त रॅलीही झाली. आता अमेठीतील जनता अखेर कोणाला खासदार म्हणून निवडून देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधले हेाते.
२००४, २००९ आणि २०१४ मध्ये राहुल गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकली होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. भाजपच्या स्मृती इराणी यांनी त्यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.