![Lok Sabha Election Result LIVE : इंडिया-एनडीएमध्ये अटीतटीची लढत](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2FUntitled-design-T-.-1-97.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी आज (दि. ४ जून) सकाळी आठला प्रारंभ झाला आहे. सुरुवातीच्या मतमाेजणीनंत भाजप प्रणित एनडीए 288 तर भाजप विरोधी इंडिया आघाडी 220अशी अटीतटीची लढत असल्याचे चित्र आहे.
निवडणूक आयाेगाने प्रारंभीच्या मतमाेजणीत भाजप ११० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ४२, समाजवादी पार्टी १९ आणि आम आदमी पार्टी १९ जागांवर आघाडी असल्याचे स्पष्ट केले आहे.
मंगळवारी होणार असून 543 सदस्यांच्या लोकसभेत कोणत्या पक्षाची सत्ता येणार याचे चित्र सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे. सत्तेचा कौल कोणाला मिळणार याची अवघ्या देशात उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजांत नरेंद्र मोदी यांची हॅट्ट्रिक होईल व 300 हून अधिक जागांसह भाजपचीच सत्ता येईल, असे म्हटले आहे; तर यावेळी आम्ही 295 जागा जिंकू, असा विश्वास व्यक्त करीत इंडिया आघाडीने एक्झिट पोलच नाकारले आहेत. त्यामुळे मंगळवारी प्रत्यक्ष ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल तेव्हाच या देशाची सत्तासुंदरी कुणाच्या गळ्यात माळ घालेल ते दिसून येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रचारमोहीम राबवणार्या भाजपला तिसर्यांदा विजयाचा आत्मविश्वास असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जादू पुन्हा चालेल, अशी अपेक्षा आहे. भाजपच्या पुढाकाराने एनडीए ही निवडणूक लढवत आहे. कलम 370, राम मंदिर, मजबूत अर्थव्यवस्था, दहशतवादाचा निःपात, जागतिक पातळीवर भारताची वाढलेली ताकद, विविध कल्याणकारी योजना, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, चांद्रमोहीम आदी बाबी या निवडणुकीत फायदेशीर ठरतील, अशी भाजपची अपेक्षा आहे.
विरोधकांच्या बाबतीत 2014 व 2019 च्या तुलनेत एकदम वेगळी स्थिती पाहायला मिळाली. दहा वर्षे सत्तेपासून दूर राहिलेल्या विरोधकांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या पुढाकाराने इंडिया आघाडी स्थापन झाली. भाजपच्या 400 पारच्या नार्यामुळे संविधानाला धोका आहे, असा प्रचाराचा विषय इंडिया आघाडीला मिळाला. त्याशिवाय महागाई, बेरोजगारी, अग्निवीर भरती या विषयांवर विरोधकांनी भाजप सरकारवर हल्ला चढवला होता.
यंदाच्या निवडणुकीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, प. बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक या सात राज्यांच्या निकालावर दिल्लीची सत्ता कुणाची याचा फैसला होणार आहे. गेल्या निवडणुकीत या सर्व राज्यांत नेत्रदीपक कामगिरी करणार्या भाजपला त्याच यशाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे; तर भाजपला रोखण्यासाठी या राज्यांत इंडिया आघाडीला यश मिळवावे लागणार आहे.