पुढारी ऑनलाईन डेस्क: मान्सून गुरूवारी ३० मे रोजी वेळेआधीच दोन दिवस केरळमध्ये दाखल झाला. दरम्यान मान्सून वेगाने पुढे वाटचाल करत असून, सध्या तो दक्षिणेतील अनेक राज्यात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
हवामान विभागाने म्हटले आहे की, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, कर्नाटकचा आणखी काही भाग, रायलसीमा, किनारी आंध्र प्रदेश, तेलंगणाचा काही भाग आणि पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आज 3 जून रोजी पुढे सरकला आहे.
दक्षिण द्वीपकल्पीय भारतातील उर्वरित भाग, दक्षिण छत्तीसगड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग, पश्चिम मध्य आणि वायव्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात येत्या ४ ते ५ दिवसांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.
राज्यात मान्सून नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस उशिरा म्हणजे ७ ते ८ जून रोजी येईल. त्यापुढे तो राज्यभर १२ ते १७ जूनदरम्यान पोहोचेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९९ टक्के पाऊस होईल. यंदा कोकणात १०३ टक्के इतका सर्वाधिक पाऊस होईल. तेथे ऑगस्ट महिन्यात महापुराची शक्यता आहे, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.