महाराष्ट्रासह ९ राज्यांत तापमान ४२ अंशांवर | पुढारी

महाराष्ट्रासह ९ राज्यांत तापमान ४२ अंशांवर

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : महाराष्ट्रासह छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि गुजरात या राज्यांचे सरासरी कमाल तापमान शनिवारी 42 अंशांवर गेले होते. रविवारी बिहार, झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये उष्णतेची लाट होती. ओडिशाचे सरासरी कमाल तापमानाने तब्बल 45 अंश सेल्सिअसपर्यंत गेले. ओडिशातील बारीपाडा जिल्ह्यात शनिवारी तसेच रविवारीही 45.2 अंश तापमानाची नोंद झाली.

हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पुढील तीन दिवस अशीच स्थिती येथे राहील. राजधानी दिल्लीत रविवारी कमाल तापमान 38 अंशांच्या आसपास होते. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सिक्कीम, पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा राज्यांतून काही ठिकाणी पाऊसही झाला.

आज वादळी वारे

महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आसाममध्ये सोमवारी विजांचा कडकडाट आणि धुळीचे वादळ शक्य आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहार, झारखंडमध्ये उष्णतेची लाट राहील. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरीमध्ये तीव्र ऊन असेल.

Back to top button