Odisha boat tragedy | ओडिशातील महानदीत बोट उलटली, ७ जणांचा मृत्यू | पुढारी

Odisha boat tragedy | ओडिशातील महानदीत बोट उलटली, ७ जणांचा मृत्यू

पुढारी ऑनलाईन डेस्क : ओडिशातील (Odisha) झारसुगुडा जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. येथील लखनपूरजवळ महानदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली. या बोटीतून सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. बचाव आणि शोधकार्यादरम्यान, शनिवारी सकाळी ६ मृतदेह सापडले. शुक्रवारी रात्री उशिरा एका महिलेचा मृतदेह मिळाला होता. यामुळे दुर्घटनेतील मृतांची संख्या ७ झाली आहे.
घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेतून अनेकांना वाचवण्यात आले. (Odisha boat tragedy)

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण शेजारच्या छत्तीसगड राज्यातील रहिवासी आहेत. ही बोट बारगड जिल्ह्यातील बंधीपाली भागातून प्रवाशांना घेऊन जात होती. बोट नदीच्या पात्रात मध्यभागी पोहोचताच तिला मोठ्या लाटांचा सामना करावा लागला. ज्यामुळे ती झारसुगुडा येथील शारदा घाटाजवळ उलटली. ज्यावळी बोट उलटली त्यावेळी स्थानिक मच्छीमार तेथे होते. त्यांनी धाडस दाखवत ४० हून अधिक लोकांना वाचवले.

दरम्यान, महानदीतील जोरदार लाटांमुळे बचावकार्यात अडचणी आल्या. दोन पाण्याखालील शोध कॅमेऱ्यांसह पाच स्कूबा डायव्हर्सनी घटनास्थळी बेपत्ता लोकांचा शोध घेतला. भाटली, बारगड, लखनपूर आणि संबलपूर येथील बचाव पथकेही होती. 

शुक्रवारी उशिरा पत्रकारांना या घटनेविषयी माहिती देताना, जिल्हाधिकारी कार्तिकेय गोयल म्हणाले की ओडिशा आपत्ती जलद कृती दल (ODRAF) झारसुगुडा जिल्हा प्रशासन तसेच राज्य सरकारच्या मदतीने बेपत्ता लोकांचा शोध घेत आहे.

बोट दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे समजल्यानंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. (Odisha boat tragedy)

 हे ही वाचा :

 

Back to top button